आषाढी यात्रेसाठी पंढरपूर पालिका प्रशासन सज्ज   

स्वच्छतेसाठी १ हजार ५४२ कर्मचार्‍यांची नियुक्ती 

सोलापूर, (प्रतिनिधी) : आषाढी शुद्ध एकादशी ०६ जुलै २०२५ रोजी होणार असून,  आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांतून सुमारे १० ते १२ लाख भाविक येतात. येणार्‍या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.  
 
आषाढी यात्रा कालावधीत शहरासह  नदी पात्र, वाळवंट, ६५ एकर परिसर, पत्रा शेड, प्रदक्षिणा  मार्ग, मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास १५४२ स्वच्छता कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून, यामध्ये नगरपरिषद पंढरपूरचे ३४८ कायम कर्मचारी तर जवळपास १००० हंगामी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत  १९४ कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत.
 
प्रशासनामार्फत पाणीपुरवठ्याच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे. आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नदी पात्र, वाळवंट परिसर, वाखरी पालखी तळ, ६५ एकर व इतर विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्षाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्यात येणार  आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार आहे.
 
शहरासह ६५ एकर, वाळवंट, पत्राशेड आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या, कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी, जेटींग आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा दोन वेळेस घरोघरीचा कचरा गोळा करतील. दररोज ५५ ते १२० टन इतका कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा काळात शहरातील व उपनगरातील सर्व मैदाने, नदी परिसर, ६५ एकर, पत्राशेड दर्शनबारी रोजचे रोज स्वच्छ व निर्जंतुक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली.
 

Related Articles