पहिल्या ‘कसोटी’त अनुत्तीर्ण   

मडविकेट, कौस्तुभ चाटे 

भारतीयनव्या क्रिकेट संघाच्या इंग्लिश दौर्‍याची सुरुवात पराभवाने झाली. लीड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपल्याला ५ गडी राखून हरवले. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तब्बल पाच शतके केली, त्यातही ऋषभ पंतने दोन्ही डावात शतक करण्याचा पराक्रम केला, पण एवढे होऊन देखील ते आपला पराभव टाळू शकले नाहीत. भारतीय संघाने अनेक पराभव बघितले आहेत, पण या पराभवाचे विश्लेषण काहीसे वेगळे असेल यात काही शंका नाही. हा पराभव जिव्हारी लागणारा आहे हे देखील खरे. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा, आणि त्यातही पहिला कसोटी सामना हे अनेक अर्थांनी वेगळे गणित असणार होते. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच उतरणार होता, रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर नव्या दमाचा हा संघ कशी कामगिरी करतो हे बघणे महत्त्वाचे होते. पण इंग्लिश दौर्‍यावरील पहिल्या पेपरमध्ये हा भारतीय संघ अनुत्तीर्ण झाल्याचे शल्य कायम राहील. 
 
या पराभवाबद्दल दोष कोणाला द्यायचा हा खरा प्रश्न आहे. आपल्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत दोन्ही डावांमध्ये मोठी धावसंख्या उभारली पण गोलंदाजांनी मात्र निराशा केली असा निष्कर्ष काढता येईल. काही अंशी ते खरेही आहे. आपले फलंदाज दोन्ही डावांमध्ये चमकले हे खरे आहे. पहिल्या डावात ३ आणि दुसर्‍या डावात २ शतके करून त्यांनी आपल्या फलंदाजीचा दर्जा दाखवला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जयस्वाल आणि कप्तान शुभमन गिलने शतक झळकावत आपले मनसुबे जाहीर केले होते. पहिल्या दिवसाच्या कामगिरीचा विचार करता हा दौरा आपला ठरणार अशी एक भाबडी आशा निर्माण झाली होती. भरीस भर म्हणजे दुसर्‍या दिवशी पंतने देखील आपले शतक पूर्ण केले. आपले तीन युवा फलंदाज अशी कामगिरी करताना बघणे सुखावणारे होते. 
 
पण इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. कसोटी पदार्पण करणारा साई सुदर्शन आणि तब्बल ८ वर्षांनी भारतीय संघात परतणारा करुण नायर हे दोघेही शून्यावर परतले, तर रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर सारखे अष्टपैलू (?) खेळाडू फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. नाही म्हणायला जयस्वालबरोबर सलामीला आलेल्या के एल राहुलने सुरुवातीला काही काळ किल्ला लढवला पण इतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. शुभमन गिल बाद झाला तेव्हा आपली धावसंख्या ४ बाद ४३० अशी होती, आणि पुढे थोड्या वेळातच आपला संघ ४७१ धावांवर सर्वबाद होऊन परतला. 
 
या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजी बहरली नसती तरच नवल होते. गेल्या काही वर्षांत ’बाझबॉल’ क्रिकेट खेळताना इंग्लंडने आपल्या फलंदाजीचा दर्जा कायमच सिद्ध केला आहे. या डावातही त्यांनी टिच्चून फलंदाजी केली. ओली पोपचे शतक, हॅरी ब्रूकचे एका धावेने चुकलेले शतक आणि बेन डकेटचे अर्धशतक याच्या जोरावर इंग्लिश संघ तोडीस तोड उत्तर देत होता. वरच्या फळीत या तिघांनी उत्तम फलंदाजी केलीच पण खालच्या फळीत देखील इंग्लिश संघाने धावा जमवल्या. त्यांच्या खालच्या फळीतील खेळांडूंनी  देखील संघाच्या धावसंख्येचा भर घातली आणि दोन्ही संघातील हाच फरक सामन्याचा विजेता ठरवण्यास महत्वाचा ठरला. भारतीय गोलंदाजी विषयी लिहिण्यासारखे काहीच नाही. जसप्रीत बुमरा सोडल्यास इतर गोलंदाजांनी निराशा केली. तिसर्‍या दिवस अखेर दोन्ही संघ समपातळीवर होते असे म्हणावे लागेल. दुसर्‍या डावात देखील भारतीय फलंदाजी एक-दोन खेळाडूंभोवतीच घुटमळत राहिली. राहुल आणि पंत या दोघांनी शतक केले, पण इतर फलंदाज मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा देखील दोन्ही संघांना विजयाची संधी आहे हे स्पष्टपणे दिसत होते. भारतीय संघाला १० बळी घ्यायचे होते तर इंग्लिश संघाला पाचव्या दिवशी साधारण ३५० धावा जमवायच्या होत्या. 
 
इंग्लिश फलंदाजीची गेल्या काही वर्षांची कामगिरी पाहता हे आव्हान तसे अवघड नव्हते. भारतीय संघाला १० बळी घ्यायचे होते, पण आपल्या गोलंदाजांना ते जमले नाही. इंग्लडचे सलामीचे फलंदाज - झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी ४२ षटकांमध्ये १८८ धावांची भागीदारी केली आणि तिथेच आपला पराभव निश्चित झाला. गिलचा नव्या दमाचा संघ आता खांदे पाडून सामना संपायची वाट बघत होता. नाही म्हणायला आपण ५ फलंदाज बाद केले पण एकूणच आपली गोलंदाजी कमकुवत होती. बुमराने पहिल्या डावात काही प्रमाणात केलेला तिखट मारा वगळता भारतीय गोलंदाजीबद्दल काही न बोललेलेच बरे. सिराज, कृष्णा, शार्दूल सारखे गोलंदाज इंग्लिश वातावरणात चांगली गोलंदाजी करू शकले नाहीत तर इतर कोणत्या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी? या पराभवाचे अनेक भागीदार आहेत. आपली गोलंदाजी चालली नाही, तर अष्टपैलू खेळाडूंनी देखील पूर्ण निराशा केली. एकीकडे आपले क्षेत्ररक्षण ढिसाळ होते,त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज खेळत असताना आपण भरपूर धावा दिल्या. त्यांना रोखण्यासाठी आपल्याकडे काहीच उत्तर नव्हते. दोन्ही डावांमध्ये आपण सोडलेले झेल या मालिकेत कायम सलत राहणार आहेत. एकूणच आपली कामगिरी - काही प्रमाणात आपली फलंदाजी वगळता, खराब होती. 
 
आपल्या फलंदाजीबद्दल थोडेसे बोलायचे म्हणजे आपण या सामन्यात तब्बल ५ शतके केली, पण पराभव वाचवू शकलो नाही. आपल्या ज्या फलंदाजांनी शतके केली त्यांनी धावा करण्याबरोबरच खेळपट्टीवर टिकून राहणे आवश्यक होते. जयस्वाल, गिल, पंत, राहुल हे सगळेच उत्तम खेळत होते, पण कुठेही कसोटी क्रिकेटचा ’वेगळा रंग’ ते दाखवू शकले नाहीत. खेळपट्टीवर टिकून राहणे ही कला फलंदाज विसरत चालले आहेत की काय अशी शंका त्याने आली.आपल्याला पहिल्या डावात साधारण १५०-२०० धावा कमी पडल्या. ३ बाद ४३० या धावसंख्येवर असताना आपण साधारण साडेपाचशे धावा करायला हव्या होत्या. तसेच इंग्लंडच्या पहिल्या डावात आपण झेल पकडू शकलो असतो तर त्यांना ३५०-३७० मध्ये बाद करणे शक्य होते, पण ते घडले नाही. दोन्ही संघांमधील हा फरक आपल्या पराभवाला कारणीभूत ठरला असे म्हणावे लागेल. मालिकेतील हा पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाला कसून अभ्यास करावा लागणार आहे. ही मालिका आपल्या संघासाठी महत्त्वाची आहे. या कसोटी सामन्यामध्ये झालेल्या चुका पुढील सामन्यांमध्ये भारतीय संघ सुधारतो का हे बघणे महत्वाचे आहे. ते झाल्यास एक चांगली कसोटी मालिका बघावयास मिळेल, अन्यथा इंग्लिश संघ आपल्या संघावर वरचढ ठरेल हे नक्की. हे चार सामने म्हणजे आपल्या कसोटी संघाची ’कसोटी’ आहे.                   

Related Articles