पुणेकरांचे राहणीमान खालावले   

डॉ. मेधा कुलकर्णी यांची खंत

पुणे:  शहरातील जीवन हलाखीचे झाले आहे. येथून हडपसरला पोहोचायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात माणूस मुंबईला पोहोचतो. विकास आराखड्यानुसार रस्ते विकसित होत नाहीत. यामुळे निर्माण होणार्‍या समस्यांमुळे पुण्यातील राहणीमानाचा दर्जा खालवला आहे. अशा बुडणार्‍या नावेचे कर्णधार आयुक्तांना केल्याची टिका राज्यसभा सदस्य डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
 
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी काल नवनियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन स्वागत केले व शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवण्याची मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक जयंत भावे, राहुल शेवाळे हे भाजपचे पदाधिकारी सोबत होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कुलकर्णी यांनी तुफान फटकेबाजी केली.
 
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, पुण्यातील नागरी जीवन हलाखीचे झाले आहे. नागरी राहणीमानाचा दर्जा खालावला आहे. नागरीकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. आपण नागरी समस्या सोडवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करा. अशी सूचना आयुक्तांना केली आहे असे त्या म्हणाल्या.
 
कोथरूड आणि शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याचा भाग झाला आहे. विकास आराखड्यातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी भूमिका घेतली जात नाही. विकास आराखड्याचे केवळ पंचवीस टक्के अंमलबजावणी होते. रस्त्यांच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी आणि विकास आराखड्यातील रस्त्यांचे वेगाने रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना आयुक्तांना केल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. 

पुलाच्या कामाला खोडा घालणारे 

झारीतील शुक्राचार्य कोण?

मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात प्राणांतिक अपघात होत आहेत. येथील उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी देऊन वर्ष झाले आहे. पण, पुलाचे काम का होत नाही? या पुलाच्या कामाला खोडा घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण? असा सवाल डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. विशेष असे की हा भाग भाजपच्या ज्येष्ठ आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पर्वती मतदार संघात आहे. 

कल्याणीनगर भागातील पब आणि बारला कोणाचा आश्रय?

कल्याणीनगर परिसरातील छतावर बेकायदा हॉटेल, क्लब सुरू आहेत. तिथे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे सेवन होते. बेकायदा कृत्य सुरू असतात. रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू असतात. येथील पन्नासहून अधिक सोसायट्यांनी याबाबत तक्रार केली आहे. परंतु त्याकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यावर कारवाई करायची जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे तितकीच महापालिकेची आहे, असेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. 
 

Related Articles