बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलकडून आपत्कालीन आरोग्य सेवा   

पिंपरी: पुणे शहरात पावसाळ्याच्या वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लॅप्टोस्पायरोसिस यांसारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले  आहे. चिंचवड येथील अदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने या पार्श्वभूमीवर अंतर्गत औषधोपचार, आपत्कालीन सेवा व बालरोग विभागांमध्ये 24 तासांची दक्षता वाढवली आहे, जेणेकरून रुग्णांना वेळीच आणि परिणामकारक उपचार मिळणार आहेत
 
पावसामुळे वाढलेली आर्द्रता आणि साचलेल्या पाण्यामुळे विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार पसरत असून, अनेक रुग्ण उशिरा उपचारासाठी येत असल्याचे हॉस्पिटलचे निरीक्षण आहे. हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार व आपत्कालीन सेवा विभागप्रमुख डॉ. अविनाश मुंडे यांनी सांगितले की, डेंग्यू, मलेरिया आणि टायफॉईड हे आजार वेळेत ओळखले गेले तर सहजपणे बरे होऊ शकतात. मात्र नागरिक ताप, उलटी, थकवा यांसारखी लक्षणे सुरुवातीला दुर्लक्षित करतात आणि त्यामुळे आजार बळावतो. पावसाळ्यातील आजार तीन प्रकारांमध्ये विभागले आहेत.  व्हेक्टर-जन्य आजार (डेंग्यू, मलेरिया, लॅप्टोस्पायरोसिस), पाण्याद्वारे पसरणारे आजार (कॉलरा, टायफॉईड, अ‍ॅक्यूट गॅस्ट्रो), आणि हवा/संपर्काद्वारे पसरणारे आजार (फ्लू, न्यूमोनिया, कोविड-19, रायनीटिस). विशेषतः कोविडच्या नव्या जे एन वन व्हेरिएंटमुळे सामान्य सर्दी, खोकला, उलटी, जुलाब यांसारखी लक्षणे दिसत आहेत, जी पचनाशी संबंधित त्रासासारखी वाटतात. त्यामुळे चुकीचे निदान होण्याचा धोका वाढला आहे.
 
पावसामुळे रस्ते ओले, धोकादायक झाले असून अपघातांची संख्या  वाढली आहे. याचा उल्लेख करून डॉ. मुंडे म्हणाले  की अपघात झाल्यानंतरची पहिली 60 मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. रक्तस्राव किंवा मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यास 3-5 मिनिटांत गंभीर परिणाम होऊ शकतात.डॉ. राहुल बस्ते, अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार, यांनी नागरिकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्ट केले की बरेच आजार हे व्हायरल अथवा बॅक्टेरियल असून योग्य वेळी तपासणी आणि औषधोपचार घेतल्यास सहज बरे होऊ शकतात. पण बर्‍याच वेळा लोक स्वतःच औषधे घेऊन आजार बिघडवतात. त्यामुळे स्वच्छता राखणे, उकळलेले/फिल्टर केलेले पाणी पिणे, बाहेरचे अन्न टाळणे आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. असे सांगितले
 
बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यामुळे त्यांच्यातही सर्दी, खोकला, ताप, गॅस्ट्रो, त्वचाविकार आणि डेंग्यू-मलेरिया यांची वाढ होत असल्याचे  बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया मानकरे यांनी सांगितले. त्यांनी  मुलांचे ओले कपडे लवकर बदलणे, स्वच्छ व हवेशीर ठिकाणी खेळण्यासाठी प्रोत्साहन देणे, डासांपासून संरक्षण करणे आणि आहारात पपई, हळदीचं दूध, सूप, डाळिंब यासारखे प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ देण्याचे आवाहन  केले. फ्लू, टायफॉईड व हिपॅटायटिसA यांसारख्या लसी वेळेत देणे आवश्यक आहे. असे त्या म्हणाल्या 
 
डॉ. पार्थ दलाल, पेडियाट्रिक आयसीयू इंचार्ज, यांनी सांगितले की कोविड महामारीच्या काळात सर्वांनी स्वच्छतेचे काटेकोर पालन केल्यामुळे पावसाळी आजारांमध्ये घट झाली होती. त्यामुळे असे प्रतिबंधात्मक उपाय नियमितपणे राबवले, तर रुग्णसंख्या निश्चितच कमी होऊ शकते. या सर्व पार्श्वभूमीवर अदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने परवडणार्‍या दरात  तपासणी पॅकेजेस सुरू केली असून, त्यात  डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लॅप्टोस्पायरोसिस यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी मोफत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 0 ते 16 वयोगटातील मुलांसाठी सवलतीत लसीकरण सेवा चालू आहे.

Related Articles