माउलींच्या पादुकांचे शाही स्नान थाटात   

पालखी सातार्‍याकडे मार्गस्थ

रामदास राऊत, नीरा, (वार्ताहर) : संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तिभावाने भरलेला शाहीस्नान सोहळा गुरुवारी नीरा नदीच्या काठावर थाटात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक, वारकरी आणि माउली भक्तांनी नदी किनार्‍यावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
 
दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा नीरा येथे थांबला होता. विश्रांतीनंतर दुपारी २ वाजता संत ज्ञानेश्वर माउलींचा शाहीस्नान सोहळा सुरू झाला. पुरंदर तालुक्यातील नीरा नदीवर असलेल्या विसावा स्थळावरील विसावा संपल्यानंतर ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलावरून माउलींचा रथ आणि त्यासोबतचा संपूर्ण लवाजमा नदीकडे दत्त घाटाकडे मार्गस्थ झाला. या क्षणांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पुलावर आणि नदीकाठी हजारो वारकर्‍यांनी गर्दी केली होती.
 
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका रथातून बाहेर काढून नीरा नदीवरील दत्त घाटावर आणण्यात आल्या. या वेळी परिसरात माउली माउलीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. भक्तिभाव आणि श्रद्धेने भारलेल्या वातावरणात, माउलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. या सोहळ्याला अनेक मान्यवर, वारकरी संप्रदायाचे प्रमुख, कीर्तनकार आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
 
स्नानानंतर माउलींना तुळशीहार अर्पण करण्यात आला. यानंतर माउलींच्या पादुका पालखी रथात ठेवण्यात आल्या आणि पुढील मुक्कामासाठी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील लोणंदकडे मार्गस्थ झाली. या वेळी नीरा नदी काठावर सातारकरांनी माउलींचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. सातारा जिल्हा हा वारी सुरुरूकरणार्‍या हैबतबाबांचे जन्मस्थान असून, वारकर्‍यांसाठी या ठिकाणाचे विशेष महत्त्व आहे.
 
पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी माउलींना भक्तिभावाने निरोप दिला. नीरा नगरीतील वारकर्‍यांनी, स्थानिक ग्रामस्थांनी आणि श्रद्धावानांनी माउलींचे शाहीस्नान पाहून आपले जीवन धन्य मानले. आषाढी वारीचा हा टप्पा अत्यंत भक्तीने भरलेला आणि पवित्र मानला जातो. वारकर्‍यांसाठी हा क्षण म्हणजे जीवनातील आध्यात्मिक शिखरगाठ असल्यासारखा अनुभव असतो. माउलींच्या पादुकांचा शाही स्नान सोहळा म्हणजे भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक एकतेचे अद्भुत प्रतीक आहे. 
 
पुणे जिल्ह्याच्या वतीने नालासोपार्‍याचे आमदार राजन नाईक, अप्पर पोलिस महासंचालक निखील गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, डीवायएसपी तानाजी बरडे, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्यासह नीरा व परिसरातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला निरोप दिला.
 
सातारा जिल्ह्याच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभुराज देसाई,  मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस प्रमुख तुषार दोशी, अप्पर पोलिस प्रमुख वैशाली कडुकर, याशनी नागराजन,   राजेंद्र कचरे, अजित पाटील, मंगल माने, दशरथ धायगुडे यांनी पालखीचे जोरदार स्वागत केले.

माउलींचा स्नान सोहळा एक तास उशिरा 

संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दरवर्षी एक वाजता स्नानासाठी येत असतो. मात्र, यावर्षी सातार्‍याच्या बाजूने वाहतूक कोंडी झाल्याने माउलींचा सोहळा वेळेवर स्नानासाठी मार्गस्थ होऊ शकला नाही. त्यामुळे हा सोहळा दुपारी दोन वाजता स्नानासाठी मार्गस्थ झाला. यावर्षी निरा येथे हा पालखी सोहळा अर्धा तास अगोदर आला. मात्र सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी नियोजनात ढिसाळपणा केल्याने वारकर्‍यांना त्यांची वाहने पुढे नेणे अवघड झाले होते. त्यामुळे स्वयंपाकाची वाहने मुक्कामाच्या ठिकाणी पोहचू न शकल्याने रात्रीचे जेवण हे आता उशिरा होणार असून, सोहळा मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 

Related Articles