कतारमधील तुरुंगातून ८ भारतीयांची सुटका   

 

सात मायदेशी परतले

नवी दिल्ली : कतारने तुरुंगात डांबलेल्या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांची सुटका केली आहे. त्यापैकी सात सोमवारी पहाटे मायदेशी परतले. 

ऑगस्ट 2022 मध्ये नौदलाच्या 8 माजी अधिकार्‍यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती. तर, 26 ऑक्टोबर रोजी कतारच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर, भारताने कतारशी तातडीने संपर्क साधला होता. 

नवी दिल्लीच्या राजनैतिक हस्तक्षेपानंतर डिसेंबरमध्ये माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांची फाशीची शिक्षा तुरुंगात बदलण्यात आली होती. कतार अधिकार्‍यांनी किंवा नवी दिल्लीने कोणतेही आरोप सार्वजनिक केले नाहीत.

आठ भारतीयांच्या सुटकेच्या आणि त्यांना मायदेशी पाठविण्याच्या कतार सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कूटनीती कामाला आली आहे. 

 

यांची झाली सुटका

 

कॅप्टन नवतेज सिंह, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुग्राकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि सेलर रागेश.

Related Articles