पुण्यात रिक्षा प्रवास सप्टेंबरमध्ये महागणार   

किमान भाडे 30 रुपये होणार

पुणे : पुणेकरांना येत्या 1 सप्टेंबरपासून रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत रिक्षा भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली असून, किमान भाडे 25 रुपयांवरून 30 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पहिल्या दीड किलोमीटरनंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी आकारले जाणारे भाडे 17 रुपयांवरून 20 रुपये करण्यात येणार आहे.
 
पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढती महागाई, सीएनजीच्या किमतीतील सातत्याने होत असलेली वाढ आणि वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढलेला खर्च लक्षात घेऊन रिक्षाचालक संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आरटीएच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली आणि दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
 
सध्या पुण्यात पहिल्या दीड किलोमीटरसाठी 25 रुपये किमान भाडे आकारले जाते. नव्या निर्णयानुसार ते 30 रुपये होईल. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठीचा दर 17 रुपयांऐवजी 20 रुपये आकारला जाईल. ही नवीन दररचना 1 सप्टेंबरपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यात लागू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, नवीन भाडेदर लागू होण्यापूर्वी सर्व रिक्षाचालकांना आपल्या वाहनांच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन करून घेणे आवश्यक राहणार आहे. मीटर अद्ययावत झाल्यानंतरच नवीन दरानुसार भाडे आकारता येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार वाढणार असला, तरी वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या रिक्षाचालकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
भाडेदरातील बदलपहिले दीड किलोमीटर : 25 रुपये - 30 रुपये
त्यानंतर प्रत्येक किलोमीटर : 17 रुपये - 20 रुपये

Related Articles