नासाला दिसला येरवड्याचा कचरा?   

उपरोधिक संदेशाद्वारे प्रशासनाचे वेधले लक्ष

येरवडा : स्वच्छ भारत मोहिमेत येरवड्याला प्रथम क्रमांक मिळणार असून, नासाच्या वैज्ञानिकांनी अंतराळातून पाहिले असता त्यांना येरवड्यातील सुंदर दृश्य दिसले, अशा आशयाचा एक उपरोधिक संदेश सध्या येरवड्यात जोरदार व्हायरल होत आहे. वरकरणी कौतुकास्पद वाटणारा हा संदेश प्रत्यक्षात मात्र येरवड्यातील कचर्‍याच्या ढिगार्‍यांवर आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर मारलेला तीव्र टोला आहे.
  
येरवड्यातील पर्णकुटी सोसायटी आणि आसपासच्या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. या अस्वच्छतेमुळे स्थानिक रहिवासी कमालीचे त्रस्त झाले असून, याचा थेट फटका आता येथील तरुणांच्या लग्नांवर होऊ लागला आहे. कचर्‍यामुळे लग्नाचे प्रस्ताव नाकारले;नागरिक स्थलांतराच्या विचारात!पर्णकुटी सोसायटीमध्ये सुमारे 65 हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत.सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच कचर्‍याचे मोठे ढीग साचलेले असतात. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीतील तरुण-तरुणींसाठी जेव्हा लग्नाचे स्थळ पाहण्यासाठी पाहुणे येतात, तेव्हा त्यांना बाहेरच कचर्‍याचे साम्राज्य आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या विदारक चित्रामुळे अनेक मुलींच्या घरच्यांकडून लग्नाचे प्रस्ताव थेट नाकारले जात आहेत. या त्रासाला कंटाळून आता अनेक नागरिकांनी या भागातून स्थलांतर करण्याचा विचार सुरू केला आहे.
 
घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहनसामाजिक कार्यकर्ते एजाज रहमान खान आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या विषयाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी येरवडावासीयांनाही एक नम्र आवाहन केले आहे.आपल्या परिसराची स्वच्छता राखणे ही आपलीही जबाबदारी आहे. नागरिकांनी घराबाहेर किंवा उघड्यावर कचरा न टाकता, दाराशी येणार्‍या घंटागाडीमध्येच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून टाकावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.आता या उपरोधिक आंदोलनानंतर तरी पुणे महानगरपालिका  आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालय या समस्येकडे गांभीर्याने पाहणार का? आणि पर्णकुटी सोसायटीच्या नागरिकांना या नरकयातनेतून मुक्ती मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles