बॉलिवूडमधील अभिनेत्यांची अयोध्येत गुंतवणूक   

वृत्तवेध 

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत अनेक भूखंड खरेदी करण्यासाठी सुमारे 90 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रणबीर कपूरने राम मंदिर परिसराजवळील एका आलिशान भूखंडासाठी 3.31 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येचा कायापालट होत असून हे शहर आलिशान रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि आध्यात्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनत आहे. इथे नव्या हॉटेल्सपासून कनेक्टिविटीपर्यंत अनेक विकासकामे होत आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी अयोध्येत मोठी गुंतवणूक केली आहे. राम मंदिराच्या उभारणीपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी अयोध्येला आपली पसंती दिली आहे. यात सर्वांत मोठे नाव आहे, बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांचे.
 
बच्चन यांनी अयोध्येत मालमत्तेचा एक मोठा पोर्टफोलिओ उभा केला आहे. त्यांची एकूण गुंतवणूक 90 ते 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’या डेव्हलपरच्या माध्यमातून शहरातील आलिशान रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणारे ते पहिलेच बडे सेलिब्रिटी ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना लोढा यांनी 2023 मधील एका घटनेचा किस्सा सांगितला. तेव्हा ते ऑस्ट्रेलियात होते. एक दिवस पहाटे तीन वाजता त्यांना एक फोन आला. त्या फोनपूर्वी त्यांना काही ‘मिस्ड कॉल्स’ आणि मेसेज आले होते, ज्यात म्हटले होते, ‘मी अमिताभ बच्चन बोलतोय, कृपया तुमच्या सोयीनुसार मला परत फोन करा.’ त्यानंतर अभिनंदन यांनी ‘बिग बीं’ना परत फोन केला, तेव्हा बच्चन यांनी सांगितले, की मी उत्तर प्रदेशचा आहे आणि मला अयोध्येत जमीन खरेदी करायची आहे. 
 
अमिताभ यांनी सुरुवातीला किमतीबद्दल विचारणा केली. अभिनंदन यांनी त्यांना सांगितले, की 15 हजार चौरस फुटांच्या भूखंडाची किंमत 15 कोटी रुपये आहे. बच्चन यांनी दुसर्‍याच दिवशी 15 कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि हा व्यवहार पूर्ण झाला. अभिनेता रणबीर कपूर याने अयोध्येतील आलिशान रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. रामायण सिनेमात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्यापूर्वी, त्याने खालील मालमत्ता खरेदी करून आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा विस्तार केला. जगभरातील भाविकांसाठी अयोध्या हे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी 85 हजार कोटी रुपये खर्चाचे पायाभूत सुविधांचे प्रचंड प्रमाणावरील परिवर्तन सध्या सुरू आहे. यामध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अद्ययावत करण्यात आलेले अयोध्या धाम रेल्वे स्थानक आणि 187 किलोमीटर लांबीच्या ‘नमो भारत कॉरिडॉर’ला मिळालेली मंजुरी यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. हा कॉरिडॉर कानपूर आणि अयोध्या यांना अवघ्या 90 मिनिटांमध्ये जोडेल.

Related Articles