धरणांतील पाणीसाठ्यात चार टीएमसीने वाढ   

पुणेकरांना दिलासा

पुणे : धरण क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार ते मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील २४ तासांत धरणात ४ टीएमसी पाणी वाढले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार असून, पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
 
पुण्याच्या पाणलोट क्षेत्रातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण परिसरात तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच, घाट माथ्यावरही जोरदार ते मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून धरणांतील पाणी साठ्यात वाढ होत आहे. विशेषतः सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी पहाटेपर्यंत कोसळलेल्या पावसामुळे धरणांतील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली असून, धरणांतील पाण्याची टक्केवारी ४१.८८ पर्यंत पोहचली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांतील पाण्याची क्षमता २९.१५ टीएमसी आहे. सध्या धरणांत १२.२१ टीएमसी पाणी साठले आहे. खडकवासला ९० टक्के तर, पानशेत धरण ३९.४१ टक्के भरले आहे. डोंगरावरून वाहून येणार्‍या पाण्याचा ओघ पुढील दोन दिवस सुरूच असणार आहे. त्यामुळे दोन दिवस धरणांतील पाणीसाठ्यात वाढ कायम असणार आहे. तसेच, धरण क्षेत्रात पाऊस कायम असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
यंदा पावसाला विलंब झाल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली होती. पावसाला सुरुवात होण्यासाठी धरणांत केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. महापालिका प्रशासनानेही पाणी कपात करून दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सर्वांचे डोळे पावसाकडे लागले होते. मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणांतील पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.  

धरणातून पाणी सोडले 

खडकवासला धरण काल दुपारी ९० टक्के भरले. त्यामुळे नवीन मुठा उजवा कालव्यातून ५०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. घाट माथ्यावर तीन दिवसांपासून जोरदार ते मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस वाहून येणार्‍या पाण्याचे प्रमाण अधिक असणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून आणखी पाणी सोडले जाणार असल्याचा अंदाज आहे. सध्या चारही धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत आहे.

Related Articles