सर्वांचीच कसोटी (अग्रलेख)   

मुसळधार पावसामुळे महाबळेश्‍वर परिरातील नावली गावाचा काही भाग खचला. लोणावळा परिसरात दरड कोसळून बळी गेले. बेसुमार वृक्षतोडीमुळे आपण असुरक्षिततेला निमंत्रण देत आहोत. 
 
जवळपास  जून महिना पावसाच्या प्रतिक्षेत गेला होता. आता जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राज्यभर पाऊस थैमान घालत आहे. सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढल्याने सर्वसामान्य नागरिकांवर कसोटीची वेळ आली आहे. पुणे- मुंबई वाहतूक पूर्ण बंद पडणे, हा तर आणीबाणीचा प्रसंग. काल हजारो प्रवाशांना, मुंबईत नोकरी- व्यवसायासाठी रोज ये- जा करणार्‍यांना त्याचा प्रचंड फटका बसला. पुणे - मुंबई प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ साधत नवा बोगदा करण्यात आला. पण त्यावर विसंबून राहण्यात अर्थ नाही, हाच धडा आता मिळाला आहे.  या नव्या बोगद्याचा खांब पडला, एका मोटारीवर दगड कोसळला. जोरदार पावसामुळे हे होणारच, या पद्धतीने याचे समर्थन करण्याची मानसिकता दिसते. ती योग्य नाही. घाटमाथ्यावर पडणार्‍या पावसाचे प्रमाण, डोंगर- दर्‍यांची रचना याचा अभ्यास करून नवे मार्ग बांधले जातात आणि किमान नैसर्गिक आपत्तीमुळे धोका निर्माण होणार नाही हे पाहिले जाते, असा समज होता. या बांधकामाशी संबंधित सरकारी यंत्रणांकडून तो खोटा ठरविला जात आहे. ‘मिसिंग लिंक’चे काम गुणवतेचे झालेले नाही, हे पहिल्याच मोठ्या पावसाने दाखवून दिले. जुन्या पुणे - मुंबई मार्गावरून वाहतूक वळविण्याचा पर्यायही आपल्याकडे नाही, हे तर प्रशासनाचे दारुण अपयश. नियमित होणार्‍या आणि विशेषतः पावसाळ्याआधीच्या रेल्वे रुळांच्या डागडुजीबद्दल प्रश्‍न निर्माण होतात. दोन महामार्ग बंद, रेल्वे मार्ग बंद, हे अशोभनीय तर आहेच, पण दोन्ही महानगरांना ते परवडणारे नाही. विकास कामांना विरोध नाही, पण त्यासाठी मानवी जीवांची किंमत मोजावी लागता कामा नये. ती जबाबदारी सरकारची आहे.
 
तात्पुरती मलमपट्टी
 
लोणावळा परिसरात पाटण या गावात दरड कोसळून तीन बळी गेले. एकाच कुटुंबातील या व्यक्ती होत्या. माळीणच्या दुर्घटनेची आठवण करून देणरी ही घटना. पुन्हा या बाबतीतही उदासीन मानसिकतेचे दर्शन घडते. मुंबईची स्थिती तर सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणातून तेथे मॅनहोलमध्ये पडून मृत्यु होतो, लोकप्रतिनिधी म्हणविणार्‍यांना त्याबद्दल बोलताना हसावेसे वाटते, हे विदारक चित्र. रस्त्याच्या कडेला असलेली जी झाडे पावसाळ्यात धोकादायक ठरु शकतात त्याकडे लक्ष देण्यासाठी विभाग आहे. पण तो कागदोपत्री असल्यासारखी स्थिती! अन्यथा कुर्ला आणि गोरेगावमधील आरे डेअरी परिसरात दोन बळी गेले नसते. तात्पुरती मलमपट्टी, श्रेय घेण्यासाठी कामांच्या गुणवत्तेची योग्य पडताळणी करण्याआधी उद्घाटनांची घाई, कामे करताना असलेली टक्केवारी यावर जेव्हा उपाय होतील तेव्हा कितीही पाऊस आला तरी सामान्यांना असुरक्षित वाटणार नाही. पुण्यासारख्या महानगरात एकमेव जंगली महाराज रस्ता अनेक दशके होऊनही सुस्थितीत राहतो आणि कालची- आजची बांधकामे पावसाने उघडी पडतात, गल्लीबोळातील रस्ते सोडाच, पण मुख्य रस्तेही खड्डयात! बरे, याबद्दल किमान खेद तरी वाटावा! तसेही नाही. नागरिक सोशीक आहेत, चुकीच्या गोष्टी खपून जातात, हे यंत्रणा राबविणार्‍यांना केव्हाच समजले आहे. दोष पावसाचा नाही! पावसाअभावी  शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. आताच्या  पावसामुळे त्याला दिलासा मिळाला आहे. कोकणात मान्सूनचे आगमन झाल्यावर त्याची पुढची वाटचाल रेंगाळली होती. जवळपास पंधरा दिवसांनंतर मान्सून पुढे सरकला. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचेपर्यंत 24 जून, ही तारीख उजाडली! अलीकडच्या काळात एवढा विलंब कधीच झाला नव्हता. मात्र; त्यातून पेरण्यांचे गणित बिघडले. आज अनेक ठिकाणी पूराचा फटका बसला आहे. वाहून जाणारे पाणी साठवण्याची सक्षम व्यवस्था, हे आजही स्वप्नच राहिले आहे. ‘कॅच दी रेन’ सारख्या मोहिमा सरकारला हातात घ्याव्या लागतात.  तलाव आहेत, मोठे जलाशय आहेत; पण गाळ साचल्याने वापरासाठी ते निरुपयोगी, अशी अवस्था आणि जोरदार पावसानंतर पूर, पुन्हा जलाशय कोरडे, हे चित्र. जोरदार पावसाने नव्हे, सुस्त आणि बेजबादार यंत्रणांमुळे सामान्यांची हाल होत आहेत. 

Related Articles