घरांची मागणी घटली   

अर्थनगरीतून : महेश देशपांडे 

बांधकाम व्यावसायिकांनी सवलती देऊनही अनेक शहरांमध्ये फ्लॅट विकले जात नसल्याने या क्षेत्रात थोडी मंदी जाणवत आहे.सामान्य ग्राहकांना घर घेणे परवडत नसले तरी महागड्या घरांना मागणी वाढत आहे ;हा विरोधाभासही दिसत आहे. व्हेनेझुएलामध्ये भूकंप झाल्याने भारताच्या इंधन पुरवठयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
 
देशातील गृह निर्माण बाजारात गेल्या काही वर्षांमधील तेजीनंतर आता मंदीची चिन्हे दिसू लागली आहेत. आनंद राठी संस्थेच्या अहवालानुसार २०२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये विकल्या न गेलेल्या घरांचा साठा वाढून १८ महिन्यांपासून पडून असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचला आहे. म्हणजे  बाजारातील विद्यमान घरे विकण्यासाठी सुमारे दीड वर्ष लागेल. २०२४ मध्ये हा कालावधी १४ महिन्यांचा होता. अहवालानुसार, गृहनिर्माण क्षेत्रात मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोल बिघडला आहे. विकसकांना निधी सहज उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नवीन प्रकल्प बाजारात येत आहेत; मात्र त्यानुसार घरांची मागणी वाढलेली नाही. वर्षभरात  सुमारे चार लाख घरे विकली गेली असून विक्रीमध्ये  सुमारे नऊ टक्क्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे, घरांची विक्री कमी झाली असली, तरी बाजारातील एकूण व्यवहारमूल्य वाढले आहे. म्हणजेच सामान्य ग्राहकांना परवदणारी घरेही परवडत नाहीत,तर श्रीमंत ग्राहक  महागड्या  घरांकडे अधिक वळत आहेत.राठी यांच्या मते, सध्याची परिस्थिती रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी नसून ‘व्हॉल्यूम करेक्शन’ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या वेगवान वाढीनंतर बाजार स्वतःच समतोल साधत आहे. व्याजदर स्थिर राहिले किंवा कमी झाले, तर येत्या काळात गृहनिर्माण बाजाराला पुन्हा चालना मिळू शकते. 
 
८० लाख ते १.५ कोटी रुपयांच्या घरांच्या श्रेणीत २०२३ मध्ये चांगली वाढ झाली होती; मात्र २०२५ मध्ये या विभागातील विक्री आठ टक्क्यांनी कमी झाली. १.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या प्रीमियम घरांच्या विक्रीमध्ये मोठी घसरण झाली नसली, तरी वाढीचा वेग कमी झाला आहे. २०२२ मध्ये या विभागात १४९ टक्के वाढ झाली होती. ती २०२५ मध्ये केवळ सहा टक्क्यांवर आली आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये प्रीमियम घरांच्या विक्रीत १५ टक्क्यांची घट झाली आहे. 
 
भूकंपाचा भारतावर परिणाम
 
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये झालेल्या तीव्र भूकंपानंतर त्याचे पडसाद भारताच्या ऊर्जा सुरक्षेवरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडच्या काळात भारतासाठी खनिज तेलाचा महत्त्वाचा पुरवठादार बनलेल्या व्हेनेझुएलामध्ये निर्यात पायाभूत सुविधांवर परिणाम झाल्यास तेलपुरवठा, शिपिंग आणि विमा खर्चावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. व्हेनेेझुएलामध्ये अलिकडेच झालेले  दोन भूकंप  गेल्या शतकातील सर्वात तीव्र भूकंपांपैकी मानले जात आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे भारताने अलीकडच्या महिन्यांमध्ये खनिज  तेलाच्या आयातीसाठी व्हेनेझुएलाकडे  मोर्चा वळवला. एप्रिल आणि मे महिन्यात भारताने व्हेनेझुएलातून तेल आयात लक्षणीय वाढवली होती. तज्ज्ञांच्या मते, भूकंपामुळे तेल उत्पादन केंद्रांना मोठे नुकसान झाले नाही तरी वीजपुरवठा खंडित होणे, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे तसेच बंदरांवरील निर्बंध यामुळे तेल निर्यात आणि जहाजांची वाहतूक अनेक दिवस किंवा आठवडे उशिरा होऊ शकते.
 
व्हेनेझुएलातील ला ग्वायरा या प्रमुख कार्गो बंदरावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यामुळे जहाजांना माल चढवण्यास विलंब होणे, मार्ग बदलण्याची गरज आणि डेमरेज शुल्क (विलंब शुल्क) वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, हा जादा खर्च व्यापारी, रिफायनरी कंपन्या आणि अखेरीस ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. तज्ज्ञांचे मत आहे, या भूकंपामुळे नैसर्गिक आपत्तीचा धोका नव्याने समोर आला असून भविष्यात विमा प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलामध्ये ‘ओएनजीसी विदेश’कंपनीची  तेल प्रकल्पांमध्ये भागीदारी असून, दीर्घकाळ पुरवठा विस्कळीत राहिल्यास भारतीय गुंतवणुकीवर आर्थिक आणि कार्यकारी परिणाम होऊ शकतो.. त्यामुळे भारतास ऊर्जा आयात विविध देशांमध्ये विभागण्याबरोबरच पुरवठा साखळीतील नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे. 

हिर्‍यांची चमक वाढली 

भारतात नैसर्गिक हिर्‍यांच्या दागिन्यांची मागणी सध्या वार्षिक सुमारे १२ टक्क्यांनी वाढत आहे. २०१९ मध्ये हा दर दहा टक्के होता. उद्योगक्षेत्रातील अंदाजानुसार २०३० पर्यंत भारतातील नैसर्गिक हिर्‍यांच्या दागिन्यांची बाजारपेठ सुमारे १.५२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.  या वाढीमागे महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. विवाह, वाढदिवस किंवा सण-उत्सवापुरतेच नव्हे, तर दैनंदिन वापरासाठीही हलके, आकर्षक आणि आधुनिक डिझाइनचे हिर्‍यांचे दागिने पसंत केले जात आहेत. विशेष म्हणजे तरुण ग्राहकांचा या बाजारातील वाटा तब्बल ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ही पिढी दागिन्यांकडे केवळ संपत्ती म्हणून नव्हे, तर व्यक्तिमत्त्व, भावनिक मूल्य आणि जीवनशैलीचा भाग म्हणून पाहते.
 
या वाढीमागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सोन्याच्या वाढत्या किंमती. गेल्या दोन वर्षांमध्ये सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचल्याने ग्राहक अधिक किफायतशीर पर्याय शोधू लागले आहेत. त्यामुळे हलक्या वजनातील, आधुनिक डिझाइन असलेले हिर्‍यांचे दागिने लोकप्रिय ठरत आहेत. कमी कॅरेटचे सोने आणि लहान आकारातील नैसर्गिक हिरे यांचा संगम असलेले दागिने तरुण वर्गात विशेष पसंत केले जात आहेत.
 
नैसर्गिक हिर्‍यांच्या बाजारातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा मर्यादित पुरवठा. जगभरातील प्रमुख खाणींमधून उत्पादन कमी होत आहे. अनेक प्रसिद्ध खाणींचा साठा आटत चालला असून नवीन मोठे स्रोत सापडत नाहीत. परिणामी, नैसर्गिक हिर्‍यांच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. प्रयोगशाळेत तयार होणारे कृत्रिम हिरे (लॅब-ग्रोन डायमंड) कमी किमतीत उपलब्ध असल्याने छोट्या आकाराच्या नैसर्गिक हिर्‍यांवर किंमतीचा दबाव वाढत आहे. पर्यावरणपूरक उत्पादन आणि परवडणार्‍या किमतीमुळे काही ग्राहक लॅब-ग्रोन हिर्‍यांना पसंती देत आहेत. त्यामुळे नैसर्गिक हिर्‍यांच्या उद्योगाला गुणवत्ता, दुर्मिळता आणि दीर्घकालीन मूल्य यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा हिर्‍यांना पैलू पाडण्याचा  आणि पॉलिशिंग उद्योग असलेला देश आहे. 
 

Related Articles