ठाकरे गटाच्या सहा खासदारांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश   

 

मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन केलेल्या सहा बंडखोर खासदारांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. जमिनीशी नाळ असलेले हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणार्‍या खर्‍या शिवसेनेत आले असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या खासदारांनी व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही तर मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय घेतला असून त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यांची सगळी जबाबदारी आपण घेत असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय दिना पाटील यांनी काल शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. मागच्या आठवड्यात या खासदारांच्या बंडाची सुरूवात झाली होती. एकेक करत दिल्लीत पोचलेल्या या खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन गट स्थापनेचे पत्र दिले होते. परंतु, ओमराजे निंबाळकर यांनी थोडा अवधी मागितल्यामुळे पुढची प्रक्रिया थांबली होती. ओमराजे यांनी रविवारी आपला निर्णय जाहीर केल्यानंतर काल या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
या प्रवेशाआधी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी ठाकरे गटाचे सहा खासदार आणि शिंदे यांच्यात तब्बल दोन तास बैठक झाली. 
या बैठकीनंतर शिंदे हे सहा खासदारांसोबत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आले. तेथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे सहा खासदार खर्‍या शिवसेनेत सहभागी होत असल्याचे जाहीर केले. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले असून हे सहा टायगर माझ्यासोबत आले आहेत. मी चार वर्षांनंतर चौकार नाही तर षटकार मारला आहे. २०२२ मध्ये केलेल्या उठावाचा हा दुसरा टप्पा असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.
 
४ वर्षांपूर्वी आम्ही उठाव केला. तेव्हा ४० आमदार सोबत होते. परंतु, २०२४ ला ६० आमदार निवडून आणले. जनतेने आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळाले. त्यामुळे शिवसेना राज्यातील क्रमांक दोनचा पक्ष झाला असल्याचे शिंदे म्हणाले. 
 
२०२२ ला शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी उठाव केला होता. आता हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपला लढा हिंदुत्वाच्या विचारांचा आहे. जिथे शिवसेनेचे विचार, तिथे शिवसैनिक. त्यामुळे बाळासाहेबांच्या खर्‍या शिवसेनेते सहभागी होण्याचा निर्णय यांनी घेतला. हे कोणीही व्यक्तिगत फायद्यासाठी आलेले नाहीत, असे शिंदे म्हणाले.
 

Related Articles