नको अटी, नको शर्ती; शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा   

 

विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन दणाणले
 
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. विधान भवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी नको अटी, नको शर्ती; शेतकर्‍यांना हवी कर्जमुक्ती, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, अशा घोषणा दिल्या.
 
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आंदोलन करत जोरदार घोषणा दिल्या. विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पायर्‍यांवर हातात फलक घेऊन आंदोलन केले. यावेळी विधिमंडळाचा परिसर घोषणांनी दणाणून गेला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अंबादास दानवे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक आमदार उपस्थित होते. महायुतीने सत्तेत येताना शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफीसाठी अनेक अटी व शर्ती लादून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 
कर्जमाफीचे सोंग...
 
महायुतीचे आमदार सभागृहाच्या दिशेने जात असताना आघाडीच्या आमदारांनी पुन्हा घोषणा देत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. लबाड लांडगं ढोंग करतंय... कर्जमाफीचं सोंग करतंय..., शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाय...घेतल्याशिवाय राहणार नाय... अशा घोषणा आघाडीच्या आमदारांनी दिल्या. पायर्‍यांवर आंदोलन सुरू असताना दुसर्‍या बाजूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व काही मंत्री व सत्ताधारी आमदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना विरोधकांच्या घोषणा टिपेला गेल्या होत्या.
 
टंचाईवर चर्चा करा : नाना पटोले
 
विधानसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. ’अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यातील नद्या, नाले, धरणे आणि तलाव कोरडे पडले असून भूजल पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अनेक गावांमध्ये व शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याने या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
 

Related Articles