तृणमूल फुटीच्या उंबरठ्यावर   

महाराष्ट्राप्रमाणेच दिसणार चित्र?

कोलकाता : पश्चिम बंगालमधील प्रमुख विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा सुवेंदू सरकारमधील मंत्री तापस रॉय यांनी केला. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे घडले, तसेच आता तृणमूलमध्ये पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.
 
दरम्यान, तृणमूल काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केलेल्या दोन आमदारांपैकी रितब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ममता बॅनर्जी यांच्यावर नाराज असलेल्या ५० आमदारांची काल एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक पार पडली. आता हे आमदार पक्षाच्या चिन्हावर दावा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आमच्याकडे दोन-तृतियांश बहुमत आहे. आमच्या सोबत ५० आमदार आहेत. आम्हीच तृणमूल काँग्रेस असल्याचे रिजू दत्ता यांनी सांगितले. दत्ता यांचीदेखील तृणमूलमधून हकालपट्टी झाली आहे. शोभनदेव चट्टोपाध्याय नव्हे तर रितब्रत बॅनर्जी हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनतील.  
 
शिवाय, आम्हीच तृणमूल असून पक्षाचे चिन्ह आमचेच असल्याचा दावा दत्ता यांनी केला आहे.विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या स्वाक्षरींचे जे पत्र सोपविण्यात आले आहे, त्यावरील स्वाक्षरी बनावट असल्याचा दावा संदीपन साहा आणि बॅनर्जी यांनी केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसने दोघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. बनावट स्वाक्षरीचे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) गेले आहे. 
 
या प्रकरणात सीआयडीने तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी दुसर्‍यांदा समन्स बजावले आहे. पहिल्या समन्सनंतरही ते चौकशीसाठी सीआयडीसमोर हजर झाले नाहीत.
 
या सर्व घडामोडींदरम्यान रॉय यांनी तृणमूल काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा केला. तृणमूलने फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेकांना पक्षात सामावून घेतले आहे. त्यामुळे पक्षातंर्गत मतभेद वाढले आहे. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याबाबतीत जे घडले तेच येथे पाहायला मिळेल, असा दावादेखील त्यांनी केला. रॉय २०२४ मध्ये तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
 

Related Articles