दहा हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द   

नवी दिल्ली : पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाल्यापासून भारतीय विमान कंपन्यांना दहा हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत, अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने मंगळवारी दिली.भारतीय विमान कंपन्या युरोप आणि अमेरिकेकडे दररोज ३०० ते ३५० विमानांच्या फेर्‍या चालवत असत. मात्र, सध्या अवघ्या ८़० ते ९० फेर्‍या सुरू आहेत. दररोज १५० हून अधिक फेर्‍या रद्द झाल्या आहेत, असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव असंगबा चुबा आओ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
 
२८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त हल्ला केला. त्यानंतर, इराणने इस्रायलसह आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. मागील ३९ दिवसांपासून पश्चिम आशियात संघर्ष कायम आहे.इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची जागतिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिका इराणला वारंवार धमकी देत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जेट विमानाच्या इंधनातदेखील वाढ झाली आहे. 
 
इस्रायल, जॉर्डन, लेबनॉन, कुवेत, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीसह पश्चिम आशियातील अनेक देशांनी हवाई क्षेत्र बंद केले आहेत किंवा कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांना लांबला प्रवास करावा लागत आहे. त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसत आहे.
 

Related Articles