संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी : विखे   

संगमनेर  (वार्ताहर) : तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे वेगाने पूर्ण होत आहेत. भविष्यात तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचे कामही लवकरच मार्गी लावले जाईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी दिली.
 
तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटीच्या निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील ’एस्केप’मधून पाणी सोडण्याच्या व पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अमोल खताळ, पदाधिकारी कपिल पवार, रामभाऊ रहाणे, प्रमोद रहाणे, काशिनाथ पावसे, गुलाब भोसले, राम जाजू, जनार्दन आहेर  यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
विखे म्हणाले, निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदा मुबलक पाणी उपलब्ध असले तरी ’अल निनो’च्या संभाव्य धोक्यामुळे जून महिन्यातील पावसाच्या प्रमाणावर धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. राज्यातील सर्वच धरणांतील पाण्याचा 31 ऑगस्टपर्यंतचा आढावा विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. आवर्तनाचे नियोजन योग्यप्रकारे झाल्यामुळे यंदा तालुक्यात टँकरची मागणी नाही.
 
राज्य शासन तालुक्याच्या विकासासाठी खंबीरपणे उभे आहे. हिवरगाव पावसा येथील बंधार्‍यात आलेले पाणी व सुमारे 3 कोटीच्या पुलाचे काम परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विकासाच्या माध्यमातून तालुका प्रकाशमान होत असून, राज्य शासनाची भूमिका जनहितासाठी कटिबद्ध आहे.आमदार खताळ म्हणाले, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सुटत आहेत. चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील पुलाचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लागले आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी जागेचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येईल.

Related Articles