पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतूक कोंडीमुळे बंद   

२५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

लोणावळा, (वार्ताहर) : पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ज्वलनशील वायू घेऊन टँकर पलटी झाला. त्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. तब्बल २४ तासांहून अधिक काळ महामार्ग पूर्ण बंद ठेवण्यात आला. त्यामुळे द्रुतगती महामार्गासह जुना मुंबई-पुणे महामार्गही कोलमडून पडला. आडोशी बोगदा ते बऊर गावापर्यंत सुमारे २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 
परवा सायंकाळी ५ च्या सुमारास ’प्रोपलीन’ नावाचा ज्वलनशील वायू घेऊन जाणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने थांबवली. रात्री तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्री गळती रोखण्यात अपयश आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.

प्रवाशांचे अतोनात हाल

महामार्ग बंद असल्याने हजारो प्रवासी अडकून पडले. अनेकांची नियोजित कामे विस्कळीत झाली, अनेकांची विमानाची वेळ चुकली, रुग्णवाहिकांमध्ये तासनतास रुग्ण अडकल्याने त्यांच्या जिवाचा धोका निर्माण झाला होता. पिण्याचे पाणी, अन्न आणि स्वच्छतागृहांच्या सोयीअभावी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. परिस्थिती इतकी बिकट होती की, काही चालकांनी कंटाळून चक्क महामार्गावरच चुली पेटवून जेवण तयार केले.

शेतकर्‍यांना मोठा फटका

मुंबईला भाजीपाला आणि शेतीमाल घेऊन जाणारी शेकडो वाहने या कोंडीत अडकली होती. २४ तासांहून अधिक काळ वाहने अडकून राहिल्याने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला.

’खाकी’तील माणुसकी; पोलिसांनी सावरली परिस्थिती

या संकटाच्या काळात लोणावळा शहर पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले. पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे आणि त्यांच्या पथकाने कोंडीत अडकलेल्या लहान मुले, वृद्ध आणि प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि फळांची व्यवस्था केली. पोलिसांच्या या कार्याला ’लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशन’च्या सदस्यांनीही साथ देत मदतीचा ओघ सुरू ठेवला. संकटकाळात मिळालेल्या या मदतीमुळे प्रवाशांनी पोलिसांचे आभार मानले. 
 

Related Articles