आलिशान मोटारीने 16 जणांना चिरडले   

जयपूरमध्ये अनेक स्टॉल उडविले; एकाचा मृत्यू

जयपूर : राजस्तानची राजधानी जयपूर येथे आलिशान मोटारीने 16 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. रस्त्याकडेच्या खाद्यपदार्थाचा स्टॉल होता. तेथे गर्दी होती. त्या गर्दीत मोटार घुसली होती. 
 
जयपूर येथील पत्रकार कॉलनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खारबास सर्कल परिसरात रस्त्याकडे उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल परिसरात हा अपघात शुक्रवारी रात्री झाला. आलिशान मोटार ही दुसर्‍या एका मोटारीसोबत स्पर्धा करत होती. एका क्षणी ती दुभाजकाला धडकली आणि नंतर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ती खाद्यपदार्थाच्या स्टॉलमध्ये घुसली. तेव्हा 50 हून अधिक नागरिक तेथे होते. एकूण 10 स्टॉलला मोटारीने धडक दिली होती. 16 नागरिकांना मोटारीने चिरडले. नंतर ती 100 मीटरवरील एका झाडाला धडकून थांबली..यानंतर ती उलटली होती. 16 पैकी चार जखमींना जयपुरीया रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी तिघांना उपचारानंतर घरी सोडले, अशी माहिती पोलिस अधिक़ारी मदन कडवसरा यांनी दिली. 
 
दिनेश रिनवा, असे मोटारचालकाचे नाव आहे. तो उद्योगपती असून त्याच्यासेबत अन्य दोन जण मोटारीत होते. तिघेही अपघातानंतर घटनास्थळावरुन पळून गेले होते. त्यापैकी एकाला स्थानिक नागरिकांनी पकडले  तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत सापडला. मोटार आणि त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्‍त केला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अत्यंत दुदैवी घटना अशा शब्दात दु:ख व्यक्‍त केले. जखमींवर उपचार करण्याचे आदेश दिले. आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह खिमसार यांनी जखमींची विचारपूस केली. डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना जखमींची काळजी घेण्याचे निर्देश दिले. 
 

Related Articles