संत विचारांचे प्रतिबिंब संविधानात   

न्या. बी.जी.कोळसे पाटील यांचे प्रतिपादन | संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधान जागर कार्यक्रम
 
पिंपरी : महाराष्ट्रातील सर्व संतांनी जातीभेद, स्त्री पुरुष भेद नाकारला. समतावादी भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. या संत विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसून येते यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ ठरले आहे. असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यानी केले. 
 
शहरातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड, छावा मराठा युवा महासंघ, संविधान जागर अभियान, संविधान सजगता मंच यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने चैतन्य सभागृहात संत स्वराज्य संविधान संगीत प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना कोळसे पाटील  म्हणाले की संविधानाची संपूर्ण अंमलबजावणी इथल्या सत्ताधार्‍यांकडून होत नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या रत्नप्रभा सातपुते यांनी जिजाऊ वंदना सादर केली. 
 
संविधान उद्देशिकेचे वाचन छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष संस्थापक धनाजी येळकर पाटील यांनी केले. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते  मारूती भापकर यांनी केले. जेष्ठ नेते मानव कांबळे, लोकायत सांस्कृतिक मंचच्या स्नेहल बी.एस.यांनी मनोगते व्यक्त केली. मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. लोकायत सांस्कृतिक मंचचे शुभम, अक्षय, श्रीकृष्ण व त्यांच्या टीमने संत स्वराज्य संविधान संगित प्रवचन कार्यक्रम सादर केला त्यांनी संतांच्या अभंगांचे निरूपण केले. संतांच्या सर्व धर्म समानतेच्या विचारांची अंमलबजावणी संविधानात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केल्याचे उदाहरणासह पटवून दिले. 
 
कामगार नेते काशिनाथ नखाते,मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे,संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष प्रविण कदम,छावा मराठा सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल धस,आपचे विक्की पासोटे,जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्षा सुलभा यादव, अश्विनी पाटील, प्रदीप पवार, प्रताप गुरव, सिद्धिकभाई शेख, रूहीनाज शेख, अ‍ॅड लक्ष्मण रानवडे,आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, सचिन दोनगहू, विलास पाटील उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष निरंजन सोखी, संतोष बादाडे, अशोक सातपुते, ऋषीकेश कापडी, जयंत गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.

Related Articles