उत्तरप्रदेशात भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू   

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील देवा-फतेहपूर रस्त्यावर बिशुनपूर शहराजवळ सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. वेगाने येणारा ट्रक आणि अर्टिगाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. जयपूर आणि हैदराबादमध्ये सोमवारी असाच भीषण अपघात झाला. जयपूर अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला, तर हैदराबाद अपघातात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
 
ट्रक आणि अर्टिगाची धडक इतकी भीषण होती की, गाडीचा चक्काचूर झाला. मृतांमध्ये चालक श्रीकांत शुक्ला, प्रदीप सोनी, त्यांची पत्नी माधुरी सोनी आणि त्यांचा मुलगा नितीन यांचा समावेश आहे. कारमधील ८ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मृतांमध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
 
गाडीतील लोक कानपूरमधील बिठूर येथील गंगेत पवित्र स्नान करून परत येत असताना हा अपघात झाला. माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी आणि पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवले. त्यांची गंभीर प्रकृती पाहून सर्व जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. पोलीस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा अपघात वेगामुळे झाल्याचे दिसते. सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. क्रेनच्या साहाय्याने वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अवधेश कुमार यादव यांनी सांगितलं की, जखमींना स्थानिक सीएचसीमधून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना उपचारासाठी लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले.
 

Related Articles