भारतीय पासपोर्ट जागतिक क्रमवारीत का घसरला ?   

भारतीय पासपोर्टचे जागतिक क्रमवारीतील स्थान घसरत आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, १९९ देशांपैकी भारतीय पासपोर्ट ८५ व्या स्थानावर आहे. हे स्थान मागील वर्षीच्या तुलनेत ५ अंकांनी घसरले आहे. भारतीय पासपोर्टची क्रमवारी घसरणे हे केवळ भारताच्या व्हिसा सुविधेतील बदलांमुळे नसून, जागतिक स्तरावर इतर देशांनी केलेली वेगाने प्रगती, स्थलांतरविषयक चिंता आणि अपेक्षेनुसार द्विपक्षीय करारांचा अभाव यांसारख्या अनेक घटकांचा परिणाम आहे.

पासपोर्ट सुरक्षा आणि नवीन तंत्रज्ञान

भारताचा पासपोर्ट अजूनही सुरक्षा धोक्यांसाठी असुरक्षित मानला जातो. २०२४ मध्ये दिल्ली पोलिसांनी व्हिसा आणि पासपोर्ट फसवणुकीसाठी २०३ नागरिकांना अटक केली होती. तथापि, सरकारने अलीकडेच ई-पासपोर्ट योजना सुरू केली. त्यात असलेली इलेक्ट्रॉनिक चिप बायोमेट्रिक माहिती साठवते. त्यामुळे बनावट पासपोर्ट करणे किंवा त्यात छेडछाड करणे कठीण होते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ही तांत्रिक हालचाल योग्य दिशेने आहे; परंतु भारताला आपल्या नागरिकांची जागतिक गतिशीलता वाढवण्यासाठी अधिक राजनैतिक करार आणि प्रवास भागीदारी करावी लागेल.

परस्पर व्हिसा भागीदारीत वाढ 

भारताची क्रमवारी घसरत असूनही, व्हिसा-मुक्त देशांची संख्या वाढली आहे. २०१४ मध्ये ५२ देश भारतासाठी व्हिसा-मुक्त होते. ही संख्या २०२३ पर्यंत ६० आणि २०२४ पर्यंत ६२ पर्यंत वाढण्याची अपेक्षा होती. तथापि, २०२५ मध्ये ती पुन्हा ५७ व्या स्थानावर घसरली. तरीही, २०१५ आणि २०२५ मध्ये भारताचा क्रमांक समान (८५ वा) राहिला आहे. कारण जागतिक गतिशीलता जगभरात वेगाने वाढत आहे. जगभरातील देश आता त्यांच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय प्रवास करारांवर भर देत आहेत. भारत २०१५ मधील ५२ देशांवरून २०२५ पर्यंत ५७ व्या स्थानावर पोहोचला, परंतु इतर देशांच्या जलद प्रगतीमुळे तो क्रमवारीत खाली आला. 

भारत लहान देशांपेक्षाही मागे  

भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असूनही, रवांडा (७८ वे), घाना (७४ वे) आणि अझरबैजान (७२ वे) सारखे लहान अर्थव्यवस्था असलेले देश भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत. गेल्या दशकात भारताची क्रमवारी अनेकदा ८० च्या आसपास राहिली आहे आणि २०२१ मध्ये ती ९० व्या स्थानावर घसरली होती. दरम्यान, जपान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसारखे आशियाई देश सातत्याने अव्वल स्थानांवर आहेत. 

सिंगापूर पुन्हा अव्वल स्थानावर   

जागतिक पासपोर्ट क्रमवारीत सिंगापूर यंदाही अव्वल स्थानावर आहे. त्यांचे नागरिक १९३ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात. दक्षिण कोरियाला १९० 
देशांमध्ये आणि जपानला १८९ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश आहे. त्या तुलनेत, भारतीय पासपोर्टधारक केवळ ५७ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतात. आफ्रिकन देश मॉरिटानिया देखील या यादीत ८५ व्या क्रमांकावर आहे.

पासपोर्टची ताकद आणि प्रवाशांवरील परिणाम 

पासपोर्टची क्रमवारी देशाची सॉफ्ट पॉवर, राजनैतिक प्रभाव आणि आंतरराष्ट्रीय मान्यता दर्शवते. मजबूत पासपोर्ट म्हणजे त्यांचे नागरिक अधिक प्रवास स्वातंत्र्य, चांगल्या व्यवसाय संधी आणि सुलभ जागतिक गतिशीलता अनुभवतात. पासपोर्ट कमकुुवत असेल तर अधिक कागदपत्रे, जास्त व्हिसा शुल्क, कमी प्रवास सुविधा आणि अधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. जागतिक क्रमवारीतील घट भारतीय प्रवाशांसाठी व्यावहारिक आव्हाने निर्माण करत आहे. व्हिसा प्रक्रियेला सरासरी १५ ते ३० दिवस वेळ लागतो,  तसेच ५ ते १० हजार खर्च येतो आणि तो अनेकदा नाकारला जाण्याची भीती असते. 

प्रमुख कारणे

जुलै २०२५ मध्ये भारत या क्रमवारीत ७७ व्या क्रमांकावर होता, तेव्हा भारतीय नागरिकांना ५९ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळाला होता. तथापि, ऑक्टोबरपर्यंत दोन देशांनी ही सुविधा काढून घेतली, त्यामुळे क्रमवारी ८५ व्या  स्थानावर घसरली.  

अपुरे द्विपक्षीय करार  

पासपोर्टची ताकद वाढवण्यासाठी इतर देशांसोबत परस्पर व्हिसा सवलत  करार करणे महत्त्वाचे असते. पुरेशा आणि मजबूत द्विपक्षीय प्रवासाच्या करारांच्या अभावामुळे भारतीय पासपोर्टची ताकद मर्यादित राहते.

जागतिक प्रतिमा आणि मुत्सद्देगिरी  

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असूनही, ही आर्थिक ताकद थेट जागतिक गतिशीलतेत रूपांतरित झालेली नाही. कारण पासपोर्ट क्रमवारी ही आर्थिक वाढीपेक्षा राजकीय वजन, आंतरराष्ट्रीय संबंध आणि स्थलांतर धोरणांवर अधिक अवलंबून असते. या सर्व एकत्रित घटकांमुळे भारतीय पासपोर्टची क्रमवारी ’हेन्ली पासपोर्ट इंडेक्स’ आणि तत्सम जागतिक क्रमवारीत घसरताना दिसत आहे. 

व्हिसा सुविधांमध्ये झालेली घट 

गेल्या काही वर्षांत भारतीय पासपोर्ट धारकांना व्हिसा-मुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देणार्‍या देशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एकूण व्हिसा-मुक्त क्रमवारी कमी झाली आहे. काही देशांनी, विशेषतः विकसित राष्ट्रांनी भारतीय नागरिकांसाठी त्यांचे व्हिसा नियम अधिक कठोर केले आहेत.

स्थलांतर आणि सुरक्षाविषयक चिंता 

भारतीय नागरिक व्हिसा कालावधी संपल्यानंतरही परदेशात राहतात, म्हणून अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यांसारखे देश व्हिसा नियम कठोर करत आहेत. व्हिसा अर्ज प्रक्रियेत, यजमान देश अर्जदाराच्या मूळ देशातील सुरक्षा आणि स्थलांतरण जोखमीचे कठोर मूल्यांकन करतात, ज्यामुळे अनेकदा व्हिसा मिळवणे कठीण होते.
 

Related Articles