पानशेत पुराच्या कटू आठवणी   

अनिल दत्तात्रय घुणे

दि.१२ जुलै १९६१ बुधवार पानशेत धरण फुटलेल्या या प्रसंगाला काल (१२ जुलै) ६४ वर्षे पूर्ण झाली. काही तरुण म्हणतात जुने गेले ते आता त्याचे काय करायचे? परंतु त्यांना माहित नाही, की जुन्या आठवणी आपण कधीच विसरु शकत नाही. आम्ही या प्रसंगातून कसे वाचलो ती मोदी गणपतीची कृपा. आमचे घुणे कुटुंब २७४, नारायण पेठ, होळकर चौक, पुणे ४११०३० येथील. निवासी मोक्याच्या ठिकाणी घर असल्यामुळे शाळा, मंडई, अलका, डेक्कन, भानुविलास, हिंदविजय ही चित्रपटगृहे व लकडी पूल व शनिवारवाडा असा आमचा परिसर. आमची शाळा ती म्हणजे अनाथ हिंदू महिलाश्रम. शाळा साधारणपणे अकरा वाजता भरायची. अनाथ मुलींच्या महिलाश्रमात वरच्या मजल्यावर मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.दि.१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले तेव्हा मी तेरा वर्षाचा होतो. पाऊस सलग पडत होता. नदीला पूर येणे ही काही फारशी नवीन बाब वाटत नसे. सकाळी लकडी पुलाखालून नदीला पाण्याचा लोंढा दिसत होता; पण नियतीच्या मनात वेगळेच होते.
 
शाळेत आल्यावर चर्चा ऐकायला मिळाली. आकाशवाणी केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे पाणी किती वाढले या बद्दलच्या बातम्या बंद झाल्या. दुपारी १.३० ते १.४५ पर्यंत अलका टॉकीज चौकापर्यंत पाणी वाढू लागले. नदीजवळील काठावरचा भाग पाण्याखाली जाऊ लागला. नारायण पेठ, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, पुलाची वाडी, डेक्कन परिसर, शनिवार पेठ, मंगळवार पेठ जवळजवळ सगळ्या नदीजवळच्या पेठात पुराचे पाणी शिरले. आमच्या अनाथ हिंदू महिलाश्रम शाळेत पुराचे पाणी शिरले. शाळेत जुनी विहीर होती काही अपघात घडू नये म्हणून शिक्षकांनी रिंगण करुन मुलांना बाहेर काढले. मुलांना आहे त्या स्थितीत पालकांच्या स्वाधीन करून शाळा संपूर्णपणे रिकामी करून घेतली. शाळेचे प्रमुख या नात्याने ‘केसरी’चे माजी विश्वस्त जयंतराव टिळक व आर.के. खाडिलकर यांनी फार मोलाचे सहकार्य केले. दोरीच्या सहाय्याने त्यांनी मुला-मुलींना बाहेर काढले व जीवदान दिले. अफवांचे पीकच फुटले होते. कोणी म्हणे खडकवासला धरणावरुन पाणी वाहते आहे. कोणी म्हणे संपूर्ण शहरच बुडणार. लोकांमध्ये घबराट तर इतकी उडाली होती की, बरेच लोक हनुमान टेकडीवरच जाऊन बसले. पर्वती टेकडी ही सुरक्षित जागा म्हणून बहुतेक जण तिकडे गेले. पाण्याच्या तडाख्याने मातीचे वाडे जमीनदोस्त होत होते. नारायण पेठेतील तीन मजली घरे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त होत होती. घरातील चीजवस्तू, मुकी जनावरे लोकांच्या डोळ्यासमोर वाहून जात होती. बाबा भिडे पुलाशेजारी केळकर रस्त्यावर या इमारतीच्या भव्य टेरेसवर दोनशे लोक आश्रयास आलेले होते. आम्ही सर्व आमच्या मामाच्या घरी पर्वती पायथा येथे आश्रय घेतला.
 
माझे वडील कै. दत्तात्रय बाबुराव घुणे यांच्या व्यवसायाची महत्त्वाची कागदपत्रे तसेच स्वातंत्र्यसैनिक असल्याचा दाखला वाहून गेला. अशा परिस्थितीत माझे वडील न डगमगता परत आपल्या घराकडे तीन-चार दिवसांनी माझी आई कै. इंदू दत्तात्रय घुणे यांच्याबरोबर परतले. घरात अन्नधान्य कुजलेले होते. वाड्याच्या भिंतीची पडझड झाली होती. बर्‍याच प्रमाणात वस्तू संसारपयोगी नव्हत्या. दैनिक केसरी, प्रभात व सकाळ अशी वर्तमानपत्रे होती. काही खबर व बातम्या मिळत नव्हत्या. विद्युत व पाणीपुरवठा यांची व्यवस्था होण्यास बराच वेळ लागला. त्यामुळे रेडिओ ऐकण्यास मिळत नसे.पुराने पुण्याचे स्वरुपच बदलले. जुने ऐतिहासिक पेशवेकालीन पुणे वाहूनच नष्ट झाले. नदीच्या काठची मध्यमवर्गीय वस्ती हळूहळू कोथरूड वगैरे उपनगरांकडे सरकू लागली; पण याचबरोबर मध्यवर्ती भागातील पुण्याचा नावलौकिक गेला. पुणे इतर एखाद्या शहरासारखेच वाढू लागले. पुणे पूर्ववत होण्यास दहा महिन्यांचा कालावधी लागला.

Related Articles