पाकिस्तानकडूनच दहशतवादाला खतपाणी   

कर्नल अनिल आठले यांचे प्रतिपादन 

पुणे : गेल्या ७५ वर्षांपासून भारत पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र, पाकिस्तानने कायम दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम केले आहे. पाकिस्तान आजही भारताला अणवस्त्रांची धमकी देत आहे. त्यांच्याकडून भारतीय सीमेवर हल्ले तसेच कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे पाकिस्तानला केवळ काश्मीर ताब्यात घ्यायचे नसून भारताला नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कर्नल अनिल आठले यांनी गुरूवारी व्यक्त केले.
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ’वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील ’सदा डुंबरे स्मृती ’व्याख्यानात ’पाकिस्तानबरोबर सर्वांगीण युध्दाला पर्याय काय?’ या विषयावर आठले बोलत होते. आठले म्हणाले, भारत हा कायम अहिंसा पाळणारा देश आहे. आपण बुध्दाच्या भूमीत राहतो. त्यांची तत्वे व निष्ठा देशाप्रती प्रामाणिक पणा आपल्यात आहे. मात्र, पाकिस्तान हा दुटप्पी भूमिका घेणारा आहे. केवळ हिंदू-मुस्लिम करून आंतकी हल्ले करण्यातच तो धन्य समजतो. युध्दभूमीवर पाकिस्ताला अनेक वेळा भारताने धडा शिकविला आहे. कारगिल युध्दात पाकिस्तानला चांगली चपराक बसली आहे. मात्र, पाकिस्तानात आजपर्यंत कुठलीही सुधारणा झालेली नाही. त्याला प्रत्तिउत्तर देऊनच शांत करावे लागेल, असेही आठले यांनी नमूद केले.
 
पाकिस्तान हा अणवस्त्र व क्षेपणास्त्रांच्या जोरावर भारतासह इतर शस्त्रू राष्ट्रांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ अणवस्त्र व क्षेपणास्त्र जवळ असून चालत नाही. तर त्यांची वहनक्षमता त्या देशात असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ही वहनक्षमता पाकिस्तानकडे उपलब्ध नाही. त्यामुळे पकिस्तानने अशी पोकळ धमकी देणे बंद करावे. त्यातच त्यांच्या राष्ट्राचे हित आहे. नाही तर भारतीय लष्कर सडेतोड उत्तर देईल, यात शंका नाही. भारतीय नौसेना कराची बंदराच्या पुढे पोहचली आहे. भारत युध्दाचा कधीच विचार करीत नाही. त्यामुळे पाकिस्ताने सुध्दा युध्दाचा विचार करू नये. याचे कारणेही अनेक सांगता येतील. पाकिस्तान हा आधीच आर्थिक बाबतीत कंगाल आहे, असेही आठले यांनी सांगितले. 
 
ते म्हणाले, पाकिस्तान हा केवळ हिंदू-मुस्लिम भेदभाव करून वारंवार दहशतवादी हल्ले करीत आहे. साधारणत: इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. मात्र, त्या ठिकाणी हा वाद नाही. हिंदु-मुस्लिम असा भेदभाव करण्याची पाकिस्तानची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. चीन हा कायम पाकिस्तानला मदत करीत आला आहे. मात्र, कुठलाही देश दुसर्‍या देशाला अणवस्त्रांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान देत नाही, याचे भान सुध्दा पाकिस्तानला नाही. हा आजवरचा इतिहास आहे. याची जाणीव पाकिस्ताने ठेवायला हवी, असेही आठले यांनी नमूद केले. सूत्रसंचालन कार्तिकी भिलारे यांनी केले.

Related Articles