कारवाई संपलेली नाही (अग्रलेख)   

संरक्षण खात्याने अनेक बाबी स्पष्ट केल्या असल्या तरी समाज माध्यमांवर पाकिस्तान खोटी माहिती व दावे पसरवत आहे. अतिरेकी व पाकिस्तानी लष्कर हल्ला करू शकेल हे ध्यानात घेऊन सावध राहाणे गरजेचे आहे. 
 
पहलगाममध्ये  निर्घृण हत्याकांड घडवणार्‍या  दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना अद्दल घडवण्यासाठी आखलेली ’ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई यशस्वी ठरली. त्यात किमान शंभर अतिरेकी मारले गेल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले. या बाबतीत अतिशयोक्ती करण्याचे भारतास कारण नाही, सशस्त्र दलांकडून माहिती घेऊनच सिंग यांनी हे विधान  केले असणार. व्याप्त काश्मीर व पाकिस्तानातील नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यांचा वापर अतिरेक्यांची भरती व प्रशिक्षण यासाठी केला जात होता, हे लक्षात घेतले तर तेथे बरेच अतिरेकी असणे सहज शक्य आहे, त्यामुळे मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची संख्या कदाचित जास्तही असू शकेल. भारताच्या कारवाईने जग चकित झाले आहे. बहुतेक सर्व देशांच्या नेत्यांनी भारत आणि पाकिस्तान यांना संघर्ष न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र पाकिस्तानला जास्त कडक इशारा दिल्याचे जाणवते. पण त्या देशाने आपली ‘गुंड’प्रवृत्ती दाखवली आहे; नियंत्रणरेषे जवळच्या भारतीय गावांवर पाकिस्तानी लष्कराने तोफांचा मारा केला, त्यात एका जवानासह किमान १३ जण ठार झाले आहेत. कारवाईत पाकिस्तानी नागरिकांना धक्का लागणार नाही याची काळजी भारताने घेतली होती; पण पाकिस्तान नागरिकांनाच लक्ष्य करत आहे.

नियोजनपूर्वक हल्ले

जी केंद्रे  ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत उडवण्यात आली त्यांची निवड अनमान धपक्याने करण्यात आली नव्हती. मुरिदके मधील अतिरेकी प्रशिक्षण केंद्र उभारण्यास ओसामा बिन लादेन याने पैसे पुरवले होते. मुंबईवर हल्ला करणार्‍यांना येथेच प्रशिक्षण मिळाले होते. मार्चमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कथुआ भागात चार पोलिसांची हत्या करणारे अतिरेकी सियालकोटमधील सर्जल येथील केंद्रातून आले होते. पुलवामा मध्ये लष्करी वाहनावर हल्ला करण्याची योजना आखणारा जैश ए महमदचा म्होरक्या मसूद अजहर याचे घर बहावलपूर मध्ये आहे. या व अन्य केंद्रांना भारतीय सशस्त्र दलांनी लक्ष्य केले. ’ऑपरेशन सिंदूर’ पार पडल्यावर ही माहिती संरक्षण खात्याने माध्यमांना दिली होती. संरक्षण खात्याने पत्रकार परिषदेत जे सांगितले  ते पाकिस्तानी सत्ताधीशांना दिलेले उत्तर होते. अतिरेक्यांना शिक्षा करण्याचा हक्क बजावला, ही भारताची भूमिका कायम आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या संदर्भात ठराव संमत झाला होता, त्याला अनुसरून ही कारवाई करण्यात आल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. या समितीचा पाकिस्तान हंगामी सदस्य आहे, मात्र तो आंतरराष्ट्रीय कायदे पाळणारा देश नाही हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या लष्करी केंद्रांवर हल्ला झालेला नसतानाही पाकिस्तानी लष्कर भारतीय नागरिकांवर बाँब फेक करत आहे. त्यात चार लहान मुलांसह १३ जण बळी पडले आहेत. या घटनेस भारत लगेच उत्तर देणार नाही हे पाकिस्तानलाही माहीत आहे. कारण त्यामुळे सशस्त्र संघर्ष वाढण्याचा व त्याचे रूपांतर युद्धात होण्याचा धोका आहे. दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्याने संयम पाळण्याचा सल्ला दोघांना जगातून दिला जात आहे. युद्धात आपण फार काळ टिकाव धरू शकणार नाही हे पाकिस्तान जाणून आहे. अण्वस्त्रांचा वापरही तो आधी करणार नाही कारण त्याचा परिणाम आपल्या विध्वंसात होईल याचीही त्यास कल्पना आहे. तरीही भारतीय सशस्त्र दले जागरुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला युरोपचा दौरा रद्द केला आहे, त्याच बरोबर परराष्ट्र खाते विविध देशांना आपली भूमिका समजावून सांगत आहे.‘ऑपरेशन सिंदूर’च्या बाबतीत देशातील सर्व पक्ष सरकारच्या बाजूने उभे आहेत ही चांगली बाब आहे. भारत एकसंध उभा आहे हा संदेश  त्यामुळे पाकिस्तान व जगाला गेला. या कारवाईचे काही तपशील सरकारने सर्वपक्षीय बैठकीत सांगितले नाहीत काही तपशील पक्षांच्या नेत्यांनी उघड केले नाहीत. कारण ते अत्यंत संवेदनशील आहेत. दहशतवादी व त्यांचे पाठिराखे यांच्याशी चाललेले युद्ध संपलेले नाही हे राजनाथ सिंग यांचे विधान म्हणूनच महत्त्वाचे आहे.
 

Related Articles