स्वातंत्र्य सेनानी शरदचंद्र बोस   

गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस

कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद

सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिशांच्या नजर कैदेतून १९४१ मध्ये निसटले. ऐतिहासिक पलायनानंतर तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या भारतीय सेना - आझाद हिंद फौज टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर त्यांचे बंधू शरदचंद्र बोस यांना बंगाल काँग्रेस संसदीय पक्षाच्या बहुसंख्य सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान देण्याचे ठरविले. शरदचंद्र बोस यांनी प्रोग्रेसिव्ह कोऑलिशन पक्षाची स्थापना केली. हा पक्ष निवडणुकीनंतर बंगाल विधानसभेत बहुमताचा पक्ष बनला. ज्यामुळे राज्यातील उग्र सांप्रदायिक विचारसरणीचे मुस्लिम लीग मंत्रिमंडळ उलथवून टाकता आले.
 
स्वातंत्र्यसेनानी शरदचंद्र बोस डिसेंबर १९४१ मध्ये नवीन मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून सामील झाले; परंतु मंत्रीपदाची शपथ घेण्याच्या एक दिवस आधी त्यांना ब्रिटीश सरकारने ११ डिसेंबर १९४१ रोजी सत्तारूढ जपानी राज्यकर्त्यांशी गुप्त संबंध उघड झाल्याचा आरोप करून अटक केली. शरदचंद्र बोस बंगालचे गृहमंत्री होणे हे ब्रिटीश सरकारला धोकादायक वाटल्याने त्यांना रोखण्यासाठी ही कृती करण्यात आली. १२ डिसेंबर १९४१ मध्ये शरदचंद्र बोस यांना त्यांच्या कोलकात्यातील घरातून नेण्यात आले, ते थेट सप्टेंबर १९४५ मध्येच सोडले. काही दिवस कोलकात्यातल्या प्रेसिडन्सी तुरूंगात ठेवल्यावर ब्रिटिश सरकारने त्यांना बंगालपासून दूर हलवण्याचे ठरवले. खाली दक्षिणेकडे मिचिनोपॉली (तिरूचिरापल्ली) येथे त्यांना आगगाडीने नेण्यात आले. तिथल्या मध्यवर्ती कारागृहात त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले. काही काळाने त्यांना कूर्णमधल्या मर्काराला (मीफेरी) इथे नेले आणि अटक केंद्र म्हणून वापरण्यात येणार्‍या एका मोडकळीला आलेल्या बंगल्यात ठेवले. त्यानंतर पुन्हा एकदा कुन्नूरला हलवण्यात आले. तिथे जवळजवळ तीन वर्षे म्हणजे सप्टेंबर १९४५ मध्ये सुटका होइपर्यंत त्यांना ठेवण्यात आले. २५ ऑगस्ट १९४५ रोजी कुन्नुरमध्येच शरदचंद्र बोस यांना बंधू सुभाषचंद्र बोस यांचे १८ ऑगस्ट रोजी तैपेई येथे झालेल्या हवाई अपघातात निधन झाल्याची बातमी वाचण्यास मिळाली. शरदचंद्र बोस यांनी २५ ऑगस्ट १९४५ रोजी शनिवारी आपल्या डायरीत लिहिले होते, ‘आजच्या इंडियन एक्स्प्रेस’ आणि ’हिंदु’ने सुभाष गेल्याची दृद्यद्राषक बातमी दिली आहे. चार-पाच रात्रींपूर्वी सुभाष मला भेटायला आला आहे असे स्वप्न पडले. तो या बंगल्याच्या व्हरांड्यात उभा होता आणि खूप खूप उंच झाल्यासारखा भासत होता. मी उडी मारून त्याचा चेहरा बघायचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळजवळ लगेचच तो नाहीसा झाला. तेव्हा मी या स्वप्नाचा काही अर्थ लावत बसलो नाही आणि म्हणूनच दुसर्‍या दिवशी या डायरीतही त्याविषयी काही लिहिले नाही; पण आता? त्याचा अर्थ लागतो.
 
सुभाषचंद्र बोस हे त्यांचे जीवन होते. कायमच त्यांनी सुभाषचंद्र बोस यांना राजकीय पाठिंबा दिला होता. नेताजींचे ते राजकीय आणि वैयक्तिक दोन्ही आघाड्यांवर आधारस्तंभ होते. सुभाषबाबूंच्या ‘फॉरवर्ड ब्लॉक’ चळवळीला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. फेब्रुवारी १९४३ मध्ये पाणबुडीतून युरोपमधून आशियाकडे प्रवास करण्यापूर्वी ८ फेब्रुवारी १९४३ रोजी नेताजींनी आपण लग्न केल्याचे, तसेच आपणाला एक मुलगी असल्याचे आपले ज्येष्ठ बंधू शरदचंद्र बोस (मेजदादा) यांना पत्राने कळविले होते. बंगाली भाषेत लिहिलेल्या या पत्रात मला माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळविण्याच्या युद्धात अपयश आले आणि माझे काहीही बरे-वाईट झाले, तर मला तुमच्याशी संपर्क साधता येणार नाही. त्यासाठी हे पत्र लिहित असून माझ्या गैरहजेरीत मला आयुष्यभर देत असलेले प्रेम माझ्या पत्नीला आणि मुलीला द्यावे, तसेच माझ्याकडून अपूर्ण राहिलेले काम माझ्या पत्नीकडून आणि मुलीकडून पूर्ण होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करीत आहे असे म्हंटले. दुर्दैवाने हे पत्र शरदचंद्र बोस यांना सप्टेंबर १९४५ मध्ये सुटका झाल्यानंतर मिळाले. हा एकमेव लग्न केल्याचा आणि त्यांना मुलगी असल्याचा दुवा या पत्रांमुळे अधिकृतरीत्या बोस कुटुंबियांना मिळाला. २९ नोव्हेंबर १९४८ रोजी ऑस्ट्रियामध्ये सुभाषचंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस यांच्या सहाव्या वाढदिवसादिवशी शरदचंद्र बोस त्यांची पत्नी बिवाबती बोस आणि मुले शिशिर, रोमा व चित्रा यांच्यासह सुभाषबाबूंची पत्नी, एमिली शेंकल-बोस यांच्या घरी उपस्थित होते. त्यांच्या अंत्यविधी संस्कारासाठी भारत सरकारने आपल्या एका मंत्र्यास सहभागी होण्यासाठी पाठविले होते. 

स्वतंत्र राजकीय व्यक्तीमत्व

शरदचंद्र बोस हे केवळ नेताजींचे बंधू नव्हते, तर ते स्वतः एक स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी सामाजिक ऐक्य, धर्मनिरपेक्षता आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी निस्वार्थ कार्य केले. आज जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे पुनरावलोकन करतो, तेव्हा शरदचंद्र बोस यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान इतिहास म्हणून सर्वांना माहिती हवेच. कोलकात्याच्या ३८/२ एल्जिन रस्त्यावरच बोस कुटुंबियांचे घर. ज्या घरामधून जानेवारी १९४१ मध्ये नेताजी, शिशिरची आपल्या वीस वर्षाच्या पुतण्याची मदत घेऊन निसटले. १९४६ मध्ये शरदचंद्र बोस यांनी जाहीर केले, की हे घर इथून पुढे राहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी वापरले जाणार नाही, तर ’नेताजी भवन’ या नावाने ते देशाला अर्पण केले जाईल. 
 
शरदचंद्र बोस यांचा जन्म ६ सप्टेंबर १८८९ चा. ओरिसातील कटक येथे जन्मलेले शरदचंद्र हे जानकीनाथ बोस यांचे दुसरे पुत्र आणि चौथे अपत्य. बंगाल प्रांतांमध्ये त्यावेळी पंजाब, आसाम, ओरिसा आणि संपूर्ण बंगाल याचा समावेश होता. कटकमध्ये प्राथमिक शिक्षण, १२ व्या वर्षीच मॅट्रिक होत कोलकाता येथे उच्च शिक्षण घेत एम.एची पदवी, आणि १९११ मध्ये वकील म्हणून पात्रता मिळविली. त्यांचे वडील जानकीनाथ बोस प्रतिष्ठीत वकील असले तरी १९१२ ते १४ इंग्लंडला जाऊन बारसाठी पात्र ठरलेले शरदचंद्र बोस त्यांच्या कुटुंबातील पहिलेच वकील. महान नृपेंद्रनाथ सरकार हे त्यांचे मार्गदर्शक असल्याने शरदचंद्र बोस यांनी वकिली आणि भेदक उलटतपासणीच्या संदर्भात बॅरिस्टर म्हणून प्रचंड प्रसिद्धी मिळविली. त्यांची व्यावसायिक कमाई अविश्वसनीय होती. एकीकडे त्यांची भव्य जीवनशैली असताना आपल्या धाकट्या बंधू सुभाषचंद्र बोस यांच्यापासून सुरुवात करून गरीब आणि गरजूंना विशेषतः विद्यार्थ्यांना, तसेच स्वातंत्र्यसैनिकांना मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड पैसा खर्च केला. व्यावसायिक कमाईतून प्रचंड पैसा त्यांनी बंगालमधील क्रांतीकारी चळवळीला गुप्तपणे वित्तपुरवठा करण्यासाठी खर्च केला. ज्याला ते अहिंसक चळवळीचा वैध पर्याय मानत होते. शरदचंद्र बोस आणि सुभाषचंद्र बोस हे दोघेही बंधू देशबंधू चित्तरंजन दास यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे राजकीय विचारसरणीचे अनुयायी होते. शरदचंद्र बोस यांचा असा विश्वास होता की, नैतिकदृष्ट्या चुकीचे असलेले काहीही राजकीयदृष्ट्या बरोबर नसते.

तुरुंगवासाची शिक्षा

१९१८ मध्ये काँग्रेसचे सदस्य झाल्यानंतर १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला बंगाल परिषदेचे स्वराज्य पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी स्वतःला कोलकाता महामंडळात एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून स्थापित केले. त्यांनी स्वतःला पूर्णपणे काँग्रेसच्या कामात वाहून घेत १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीचे बंगालमध्ये नेतृत्व केले. या चळवळीतील सहभागाबद्दल शरदचंद्र बोस यांना १९३२ मध्ये सिवनी आणि जबलपूर तुरुंगात साडेतीन वर्षासाठी तुरूंगवास भोगावा लागला. त्यानंतर कुर्सियांग येथील त्यांच्याच घरी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. भारतामध्ये प्रसिद्ध असलेले बॅरिस्टर शरदचंद्र बोस हे चितगाव शस्त्रागार प्रकरणातील स्वातंत्र्यसैनिकांना केस संदर्भात भेटण्यासाठी जेव्हा तुरूंगात गेले होते, तेव्हा आपल्या ब्रीफकेसमधून जिवंत बॉम्ब नेला आणि त्यांना तुरूंग फोडून बाहेर जाण्यासाठी मदत केली असे म्हंटले जाते. 
  
शरदचंद्र बोस यांनी ’प्रेस’ हे वृत्तपत्र देशबंधू चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाचे अधिकृत प्रवर्तक म्हणून सुरू केले होते. त्यामध्ये फॉरवर्ड असा उल्लेख होता ते सांभाळले. नंतर ’प्रेस’च्या ऐवजी न्यू फॉरवर्ड आणि त्यानंतर लिबर्टी असे या वृत्तपत्राचे नाव ठेवण्यात आले. ज्याचे व्यवस्थापकीय संचालक शरदचंद्र बोस होते. पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाखाली बंगाली दैनिक, बांगला कथा आणि साप्ताहिक आत्मशक्ती ज्यांचे नाव अनुक्रमे बंगबानी आणि नवशक्ती असे ठेवण्यात आले. १९२९ मध्ये त्यांनी ओरिएंट प्रेस एजन्सी वृत्तसंस्था स्थापन केली. १९४० च्या दशकात त्यांनी ’नेशन’ सुरू केले आणि त्याचे संपादन केले. शरदचंद्र बोस यांच्या मृत्यूपर्यंत ते वृत्तपत्र प्रकाशित करीत असत. या वृत्तपत्राच्या द्वारे त्यांनी स्वातंत्र्यलढा, तसेच स्वातंत्र्योत्तर काळात समाजप्रबोधनाचे काम केले. शरदचंद्र बोस यांचे आयर्लंड क्रांतिकारकांशी जवळचे संबंध होते.

सायमन कमिशनवर बहिष्कार

१९२० च्या अखेरीस काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते बनलेल्या शरदचंद्र बोस यांनी १९२८ मध्ये बंगाल विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून येत सायमन कमिशनच्या बहिष्कारात मोठी भूमिका बजावली. ९ फेब्रुवारी १९२८ रोजीचे बंगाल विधान परिषदेतील त्यांचे सायमन कमिशनच्या बहिष्कारावरील भाषण युक्तीवादाच्या तेजस्वीतेसाठी संस्मरणीय म्हणून ओळखले जाते. त्याकाळात शरदचंद्र बोस, विद्यानचंद्र रॉय, निर्मलचंद्र चंदर, नलीनी रंजन सरकार आणि तुलसी चरण गोस्वामी या पाच जणांना बंगालच्या राजकारणाचे ’पाच’ मोठे नेते म्हणून संबोधले जात. १९३८ आणि १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधींशी गंभीर मतभेदामुळे त्यांनी राजीनामा दिला, तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी ’फॉरवर्ड ब्लॉक’ ही संघटना स्थापन करून स्वातंत्र्य लढ्यासाठी संघर्ष केला. १९४५ मध्ये शरदचंद्र बोस तुरूंगातून बाहेर आल्यानंतर दुसरे महायुद्ध संपल्यावर त्यांचे राष्ट्रीय राजकारणात पुनरागमन झाले. काँग्रेसच्या झेंड्याखाली ते काँग्रेस हायकमांडचे सदस्य बनले. १९४६ च्या निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळाला आणि त्यांना केंद्रीय विधानसभेत विरोधी पक्षनेते बनवण्यात आले. तथापि इतर काँग्रेस नेत्यांशी त्यांची तत्त्वे आणि धोरणे जुळत नाहीत असे लक्षात आल्यावर १९४६ मध्ये त्यांनी कॅबिनेट मिशन योजनेला विरोध केला. ६ जानेवारी १९४७ रोजी काँग्रेस कार्यकारिणीचा राजीनामा देत बंगाल आणि पंजाबच्या फाळणीला विरोध करणारे शरदचंद्र बोस हे पहिले देशव्यापी नेते होते. खलीच्या दंगलीमध्ये महात्मा गांधी यांचेबरोबर पूर्व बंगालचा दौरा करीत दंगल शमविण्यासाठी अतोनात योगदान त्यांनी दिले. बंगालची फाळणी रोखण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत अथक प्रयत्न केले. द नेशन आणि द सोशलिस्ट ही वर्तमानपत्रे शरदचंद्र बोस यांनी १९४८ मध्ये प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

नवीन बंगालचा पुरस्कार

’द नेशन’मधील एका स्वाक्षरी केलेल्या संपादकीयात शरदचंद्र बोस यांनी संपूर्ण बंगाली हिंदू आणि मुस्लीमांच्या कल्याणासाठी पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र राज्य म्हणून भारतीय संघात सामील होण्याचे आवाहन केले होते. दुर्दैवाने हे संपादकीय २१ फेब्रुवारी १९५० रोजी त्यांच्या निधनानंतर दुसर्‍या दिवशी प्रकाशित झाले. बंगाल आणि पंजाबच्या फाळणीने शरदचंद्र बोस यांना खूप निराश केले. तथापि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात त्यांनी फाळणीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधणे, सुभाषचंद्र बोस यांच्या युद्धोत्तर कार्यक्रमावर आधारित देशाला समाजवादासाठी तयार करणे, देशातील समाजवादी आणि डाव्या शक्तींना एकत्र करणे यासाठी प्रयत्न केले. देशाच्या फाळणीच्या दुदैवी निर्णयांसाठी स्वतःच्या हाताने त्यांनी देशाच्या सरकारमध्ये काम करण्याचे नाकारले. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रखर पुरस्कर्ते असलेल्या शरदचंद्र बोस यांनी नवीन बंगाल या संकल्पनेचा प्रचार करीत, स्वतंत्र भारतात बंगाल आणि बंगाली भाषिकांचे सामर्थ्य देशबांधणीसाठी महत्त्वाचे असावे यासाठी प्रयत्न केले. अचानक त्यांच्यावर आजारपणाने मृत्यूने झडप घातल्याने महात्मा गांधी यांच्यासारखेच एक नेतृत्व आपल्यातून निघून जाऊन देशाची मोठी हानी झाली. 
 

Related Articles