रिझर्व बँकेची विक्रमी सोने खरेदी   

अर्थनगरीतून , महेश देशपांडे 

रिझर्व बँकेकडून मागील आर्थिक वर्षामध्ये ५७ टन सोन्याची खरेदी करण्यात आली. आणखी एक खास बातमी म्हणजे अमेरिकेत निर्यातीसाठी सर्व आयफोन लवकरच भारतात तयार होणार आहेत. 
 
अमेरिकन डॉलरची अस्थिरता आणि पाश्‍चात्य अर्थव्यवस्थांच्या दबावामुळे जगभरातील अनेक केंद्रीय बँका त्यांच्या साठ्यातील सोन्याचा वाटा वाढवत आहेत. भारतही या दिशेने वाटचाल करत आहे.रिझर्व बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ५७.५ टन सोने खरेदी केले. त्यामुळे देशातील एकूण सोन्याचा साठा ८७९.६ टन झाला आहे. ही गेल्या सात वर्षांमधील दुसरी सर्वात मोठी वार्षिक खरेदी मानली जात आहे. जागतिक आर्थिक अनिश्‍चितता आणि डॉलरची स्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने ही खरेदी केली आहे.
 
रिझर्व बँकेने  २०२१-२२ या आर्थिक वर्षात ६६ टन सोन्याची खरेदी केली. २०२२-२३ मध्ये ३५ टन आणि २०२३-२४ मध्ये २७ टन सोन्याची खरेदी झाली. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५७.५ टन सोने खरेदी करण्यात आले. नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा निवड झाल्यानंतर डॉलरच्या दरामध्ये सतत चढ-उतार दिसून आले. त्यामुळे सुरक्षित पर्याय मानल्या जाणार्‍या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा एकदा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सोनेखरेदीच्या धोरणामुळे आर्थिक स्थैर्य  वाढेल; शिवाय आंतरराष्ट्रीय व्यवहारातील अडचणी कमी राहतील आणि परदेशी कर्जाचा धोकाही कमी होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या कमकुवत झालेला रुपया  जागतिक स्तरावर  मजबूत करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा धोरणात्मक प्रयत्न मानला जात आहे.
 
पुढील वर्षापासून अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन भारतात तयार करण्याची योजना ‘अ‍ॅपल’ कंपनी  आखत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर प्रत्युत्तर्‍र  शुल्क लादण्याचा जाहीर केलेला  निर्णय आणि अमेरिकेचे चीनसोबत सुरू असलेल्या टॅरिफ युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. २०२६ पर्यंत देशात दर वर्षी सहा कोटींहून अधिक आयफोन तयार होतील. चीनवरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘अ‍ॅपल’ अनेक दिवसांपासून तिथून आपली पुरवठा साखळी हलवण्याचे काम करत आहे. ‘अ‍ॅपल’ने या वर्षाच्या अखेरीस आपले असेंब्ली क्षेत्र भारतात हलवण्याची योजना आखली आहे.  ‘आयफोन’च्या निर्मितीमध्ये सध्या चीनचे वर्चस्व आहे.
 
अमेरिकेच्या बाजारामध्ये विकल्या जाणार्‍या ‘आयफोन’चे उत्पादन चीनच्या बाहेर हलवल्याने कंपनीला उच्च शुल्क टाळण्यास मदत होईल. ‘आयफोन’चे उत्पादन मार्च २४ ते मार्च २५ दरम्यान ६० टक्के वाढले आहे. या बारा महिन्यांमध्ये ‘अ‍ॅपल’ ने भारतात २२ अब्ज डॉलर (सुमारे १.८८ लाख कोटी रुपये) किमतीचे आयफोन तयार केले. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत, ‘अ‍ॅपल’ ने भारतातून १७.४ अब्ज डॉलर (सुमारे १.४९ लाख कोटी) किमतीचे ‘आयफोन’ निर्यात केले. 
 
सध्या जगातील प्रत्येक पाचपैकी एक ‘आयफोन’ आता भारतात तयार केला जात आहे. भारतात, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये ‘आयफोन’ तयार केले जातात. ‘फॉक्सकॉन’ त्याचे सर्वाधिक उत्पादन करते. याशिवाय ‘टाटा इलेक्ट्रॉनिक्स’ आणि पेगाट्रॉन या कंपन्याही उत्पादन करतात. ‘अ‍ॅपल’च्या स्मार्टफोनची विक्री आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली, तर त्याचा बाजारातील हिस्सा केवळ आठ टक्के होता. मात्र पुढील काळात येथील बाजारपेठ वाढण्याची अपेक्षा आहे.भू-राजकीय तणाव, व्यापार विवाद आणि कोरोना टाळेबंदीसारख्या समस्यांमुळे कंपनीला एका देशावर जास्त अवलंबून राहणे योग्य नाही, असे वाटल्याने भारत कमी जोखमीचा पर्याय असल्याचे सिद्ध होत आहे.
 
भारत चीनपेक्षा कमी किमतीत मजूर पुरवतो. याव्यतिरिक्त, स्थानिक पातळीवर उत्पादन केल्याने कंपनीला इलेक्ट्रॉनिक्सवरील उच्च आयात खर्च टाळण्यास मदत होते. भारताच्या ‘प्रॉडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह’ (पीएलआय) योजना स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी कंपन्यांना आर्थिक सहाय्य देतात. या धोरणांमुळे ‘अ‍ॅपल’ च्या ‘फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा’सारख्या भागीदारांना भारतात अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. चीनच्या तुलनेत भारताच्या कमी आयात शुल्काचा फायदा होतो. २०२४ मध्ये भारताची आयफोनची निर्यात १२.८ अब्ज (सुमारे १,०९,६५५ कोटी रुपये) वर पोहोचली. आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ‘अ‍ॅपल’चे ‘फॉक्सकॉम’सारखे भागीदार उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी कामगारांना प्रशिक्षण देत असून कर्नाटकामधील २.७ अब्ज डॉलर (२३,१३९ कोटी) किंमतीच्या प्लांटसारख्या विविध सुविधांचा विस्तार करत आहेत.
 
जागतिक बँकेच्या  ‘पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ या  अहवालानुसार, भारताने २०११-१२ आणि २०२२-२३ दरम्यान १७.१ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. गरीब, म्हणजेच १७२ रुपयांपेक्षा कमी प्रति दिन खर्चात जगणार्‍या लोकांची संख्या २०११-१२ मधील १६.२ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये २.३ टक्क्यांपर्यंत घसरली. त्यामुळे १७.१ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत. अहवालानुसार, खेड्यांमध्ये गरिबी १८.४ टक्क्यांवरून २.८ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, तर शहरी भागात १०.७ टक्क्यांवरून १.१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. ग्रामीण-शहरी अंतर ७.७ टक्क्यांवरून १.७ टक्क्यांपर्यंत कमी झाले. ही वार्षिक १६ टक्के घट आहे.
 
गरिबांच्या आकड्यात घट झाल्यानंतर भारत आता कमी-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या श्रेणीत आला आहे.  दररोज २९२ रुपयांपेक्षा कमी कमावणार्‍यांना निम्न-मध्यमवर्गीय गरिबीत गणले जाते. या आधारावर २०११-१२ मध्ये ६१.८ टक्के लोक गरिबीत जगत होते, तर २०२२-२३ मध्ये ते २८.१ टक्क्यांपर्यंत कमी झाले. या काळात ३७.८ कोटी लोक गरिबीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. शिक्षण, आरोग्य आणि जीवनशैली या बाबींच्या आधारे गरिबीतील सुधारणांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. 
 
जागतिक बँकेच्या अहवालानुसार उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, बंगाल आणि मध्य प्रदेश या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच राज्यांमध्ये २०२१-२२ मध्ये भारतातील ६५ टक्के लोक अत्यंत गरीबीत जगत होते. त्याच वेळी, २०२२-२३ पर्यंत अत्यंत गरिबी कमी करण्यात त्यांचे योगदान दोन तृतीयांश होते. तथापि, असे असूनही या राज्यांमध्ये अजूनही भारतातील ५४ टक्के लोक अत्यंत गरिबीत राहतात. (२०२२-२३) आणि ५१ टक्के लोक बहुआयामी गरीब आहेत (२०१९-२१).

Related Articles