तिसर्‍या अमृत स्नानावेळी सुरक्षेत चुका नकोत   

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निर्देश; आज अमृत स्नानाचे आयोजन  

प्रयागराज : महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसर्‍या अमृत स्नानाचे आयोजन आज (सोमवारी) करण्यात आले. या दिवशी पवित्र स्नानाची वेळ पहाटे ५ वाजून २३ मिनिटे ते ०६ वाजून १६ मिनिटांपर्यंत आहे. या सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेसह अन्य कोणत्याही पातळीवर चुकीला वाव राहता कामा नये, असे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. तसेच महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी जबाबदार असणार्‍या अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  वसंत पंचमी स्नान महोत्सवाच्या तयारीचा आढावा रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
 
योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले होते. याला जबाबदार असलेले अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सोमवारी होणार्‍या वसंत पंचमी स्नान महोत्सवात कोणतीही त्रुटी न ठेवता व्यवस्था करण्यात येईल. यावेळी आखाड्यांची पारंपारिक मिरवणूक काढली जाईल. तत्पूर्वी संत, कल्पवासी, भक्त आणि पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित केली पाहिजे. कोणत्याही पातळीवर चुकीला वाव असता कामा नये, असे निर्देशही अधिकार्‍यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
 
पार्किंगची जागा वाढविणार
 
महाकुंभ मेळा परिसरात पार्किंगची जागा वाढवावी. भाविकांना शक्य तितके कमी चालावे लागेल, अशी व्यवस्था करा. महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सुनिश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकार्‍यांना दिले. कुठेही वाहतूक कोंडी होऊ देऊ नका, वसंत पंचमीला पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधून मोठ्या संख्येने भाविक येतील. हे लक्षात घेऊन व्यवस्था करावी. अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
 
सनातनविरोधी कट अपयशी 
 
मौनी अमावस्येच्या दुर्घटनेनंतर प्रथमच महाकुंभाला भेट दिलेले मुख्यमंत्री योगी म्हणाले, १९ दिवसांत ३२ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानाचा योग साधला आहे. मौनी अमावस्येदिवशी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. यावेळी संतांच्या संयमासमोर सनातनविरोधी कट अपयशी ठरला आहे. मौनी अमावस्येला पूर्ण संयम दाखवणार्‍या संतांचे मी अभिनंदन करतो. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत काही जण बळी पडले. अशा कठीण प्रसंगी संत पालक म्हणून प्रकट झाले. काही नागरिक सनातन धर्माच्या प्रत्येक मुद्द्यावर दिशाभूल करत आहेत. रामजन्मभूमीपासून ते आजपर्यंत त्यांचे वर्तन आणि चारित्र्य सर्वज्ञात आहे. अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. सनातन धर्माचे आदर्श आणि मूल्ये घेऊन पुढे गेले पाहिजे, असे आवाहनही योगी यांनी यावेळी केले.
 
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
 
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी दाखल जनहित अर्जावर सर्वोच्च न्यायालय आज (सोमवार) सुनावणी होणार आहे. महाकुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी. सर्व राज्यांना प्रयागराजमधील त्यांच्या सुविधा केंद्रांमध्ये भाविकांना सुरक्षा उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वांबद्दल मूलभूत माहिती देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

Related Articles