पावसाच्या लहरीवर बाजरीचे उत्पादन; पूर्व भागात पीक फुलोर्‍यात   

मंचर, (वार्ताहर) : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात यंदा सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे वेळेवर पेरणी केलेल्या शेतकर्‍यांच्या शेतातील बाजरीचे पीक सध्या फुलोर्‍यात आले आहे. पिकाला योग्य वेळी पाऊस आणि पाणी मिळाल्याने दाणे भरण्याची प्रक्रिया चांगली होऊन उत्पादन समाधानकारक मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. मात्र, उशिरा पेरणी झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतातील बाजरी अजूनही लहान अवस्थेत आहे. त्यांना मात्र पावसाची आवश्यकता आहे.
 
लाखनगाव, काठापूर, पोंदेवाडी, देवगाव इत्यादी परिसरात बाजरीचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते.काठापूर, पोंदेवाडी, लाखनगाव आणि देवगाव परिसरात वेळेवर पेरणी झालेली बाजरी सध्या फुलोर्‍यात आली असून, काही ठिकाणी दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना चांगल्या उत्पादनाची आशा आहे. 
 
दरम्यान, लोणी-धामणी परिसरात उशिरा पेरणी झाल्याने बाजरीचे पीक अद्याप लहान अवस्थेत आहे. सध्या पावसाने काहीशी ओढ दिल्याने या पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढील काळात पाऊस झाल्यास उत्पादनाला आधार मिळणार असून, पावसाअभावी कोरडवाहू बाजरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles