दुर्वा, आघाड्याची टंचाई   

दुष्काळाच्या सावटात गणेशोत्सव

शेवगाव, (वार्ताहर) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेवगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पावसाअभावी रानावनातील हिरवाई गायब झाल्याने गणपती पूजेसाठी आवश्यक असलेल्या दुर्वा, हारळ व आघाड्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप पिकांसह रानावनातील वनस्पतीही सुकू लागल्या आहेत. गणेशोत्सवात २१ दुर्वांची जुडी वाहण्याची धार्मिक परंपरा असून, त्यासाठी हारळ व आघाड्याचाही वापर केला जातो. मात्र यंदा पावसाअभावी या वनस्पतींची वाढ खुंटली आहे. ऋषीपंचमीसाठीही आघाड्याला धार्मिक महत्त्व असल्याने भाविकांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
 
दरवर्षी गरीब व कष्टकरी कुटुंबे रानोमाळ फिरून दुर्वा, आघाडा व पूजासाहित्य गोळा करून त्याची विक्री करतात. यंदा मात्र वनस्पतींची कमतरता असल्याने त्यांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पारंपरिक पूजासाहित्यावरही दुष्काळाचा परिणाम जाणवू लागला आहे.
 

Related Articles