मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न   

जरांगेंनी गैरसमज करून घेऊ नयेत : उदय सामंत

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू असताना या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ओबीसी समाजाचे कोणतेही आरक्षण कमी न करता किंवा त्यांच्यावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून, लवकरच या प्रश्‍नावर मार्ग काढला जाईल, असा विश्‍वाास त्यांनी व्यक्त केला.मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी उदय सामंत आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी पुण्यात मुख्यमंत्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर सामंत आणि लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
सामंत म्हणाले, मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. सरकार धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने काम करत असून, जरांगे यांच्याशी चर्चा करून आरक्षणाच्या प्रश्‍नावर मार्ग काढला जाईल. जरांगे यांनी कोणाच्या सांगण्यावरून गैरसमज करून घेऊ नयेत. त्यांच्या मागण्यांबाबत सरकारची कोणतीही आकसाची भूमिका नसून सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.मराठा समाजाने आंदोलनासाठी मुंबईत येऊ नये, यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगताना सामंत यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशीही मुंबईत आंदोलन करू नये यासाठी चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. ओबीसी समाजाच्या प्रश्‍नांबाबत समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी नेत्यांशी सातत्याने चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान, प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांनी काही अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत असल्याची तक्रार केल्याचे सांगितले. या तक्रारीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, संबंधित अधिकार्‍यांबाबत योग्य ती दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.मराठा आणि ओबीसी समाजात गैरसमज निर्माण होणार नाहीत, तसेच कोणत्याही समाजावर अन्याय न करता आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची सरकारची भूमिका असल्याचे या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे. 

Related Articles