वाचक लिहितात   

अंधश्रद्धेची झापडे दूर करा

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथील शासकीय आश्रमशाळेतील वसतिगृहात रात्रीच्या वेळी घुंगराचा आवाज ऐकू येणे, काही विद्यार्थिनींनी अस्वभाविकपणे हसणे - रडणे आणि त्यानंतर भूतबाधेच्या अफवेने वसतिगृहातील ८१० पैकी तब्बल ६०८ विद्यार्थिनींनी तिथून पळ काढला. २०१७ मध्ये पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात नूतनीकरणाचे काम चालू असताना तेथे मजुरांना भूत दिसलेल्या विचित्र घटनेमुळे तेथील काम ठप्प झाले होते. काही दशकांपूर्वी ’हाकामारी’ नावाच्या अफवेचे ’भूत’ पुणेकरांच्या मानगुटीवर बसले होते. यावरून अंधश्रद्धा, करणी, भूतंखेतं यांवर अडाणी, अशिक्षित जनतेची जशी गाढी श्रद्धा आहे तशीच उच्चशिक्षित लोकांची देखील मक्तेदारी आहे, हेच अधोरेखित होत नाही का? माणसाची बुद्धी गहाण ठेवायला उद्द्युक्त करणे, हाच अंधश्रद्धेचा मोठा धोका आहे. जगभरात विज्ञानाचा सूर्य तळपत असताना अंधश्रद्धेची झापड लावून जगणारा समाज आजही आपल्या आजूबाजूला असल्याची जाणीव करून देणार्‍या अशा प्रकारच्या असंख्य घटना दररोज आपल्या आसपास घडत आहेत. 

बाळकृष्ण शिंदे, पुणे

बालमनावर सुसंस्कार व्हावेत

केरळम्मध्ये एका १३ वर्षांच्या मुलीने आजोबांची हत्या करून त्यांच्याकडील पैसे चोरले. तिला आयफोन आणि दुचाकी खरेदी करायची होती! हे वाचून लक्षात येते की, मुलांना पैसे आणि वस्तू यांच्यापुढे घरातील माणसांचेही काही महत्त्व वाटत नाही! हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुलांना आई, वडील यांनी काळजीपूर्वक सद्गुणांचे संस्कार केले तर पुढे मोठी झाल्यावर हीच मुले सुजाण नागरिक होऊ शकतील. बालमनावर नुसते मोबाईलचे संस्कार व्हायला नको, हे पहावे लागेल. आपली भारतीय संस्कृती ’वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे ’संपूर्ण पृथ्वीच आपले कुटुंब आहे’, ही शिकवण देते. आपण या सुसंस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीला देऊन ती जोपासुया! 

आदिती देखणे, नवीन पनवेल.

महिलांना आदराचे स्थान द्या

’अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर हत्या’ ही बातमी अत्यंत खेदजनक असून मुळात बलात्कार हाच अमानवीय असून तो अल्पवयीन मुलीवर करणे ही मानसिक विकृती आहे. सरकारने आता बलात्काराच्या खटल्यासाठी कायमचेच फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करावे व नसरापूरसारख्या त्वरीत शिक्षा ठोठावण्यात याव्यात; पण फक्त शिक्षा करून संपणारी ही विकृती असती, तर निर्भया प्रकरणानंतर हे प्रकार कमी झाले असते; पण तसे न होता हे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळेच आपल्या पुरूषप्रधान समाजाने आतातरी महिलांना मानाचे स्थान द्यावे व त्यांना आदरयुक्त वाढविण्याचे संस्कार सर्वांवर करावेत. पिडीतेला ज्या प्रश्नांना पोलिस चौकशीत, कोर्टात तोंड द्यावे लागते ते भयंकर असते. पालकांनी सुद्धा मुलींना अनोळखी माणसाबरोबर कसे वागायचे, त्यांच्या प्रलोभनांना भरीस न पडण्याचे संस्कार करणे अत्यावश्यक आहे.

माया भाटकर, बाणेर, पुणे

निष्पक्ष चौकशी व्हावी

नीट हिंसाचाराच्या चौकशीप्रकरणी न्यायालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली ते बरेच झाले. यात आंदोलक आणि पोलिसांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्या दोघांवरच्या आरोपांची सत्यासत्यता पडताळून न्याय करणे हे सोपे काम नाही. आंदोलन शांततापूर्ण रीतीने चालू असताना पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला केला. यामागे नेमके कारण कोणते? व पोलिस बळाचा अतिरिक्त वापर करण्याचे आदेश कोणी दिले? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. यात आंदोलक व पोलिस यांच्यावरील आरोपांना निःपक्षपाती न्याय मिळणे गरजेचे आहे.

गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई

पदपथ अतिक्रमण मुक्ती

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशभरात पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू झाली आहे. नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे, वाहतूक सुरळीत व्हावी आणि सार्वजनिक जागांचा योग्य वापर व्हावा, यासाठी पदपथ मोकळे असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अतिक्रमणाविरोधातील कारवाईचे समर्थनच करावे लागेल; मात्र ही कारवाई करताना वर्षानुवर्षे पदपथावर व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या छोट्या विक्रेत्यांचा प्रश्नही संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे आहे. पदपथावरील अतिक्रमणामुळे पादचार्‍यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्याचबरोबर वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेची समस्याही निर्माण होते; मात्र केवळ फेरीवाल्यांचे स्टॉल हटवून समस्या कायमस्वरूपी सुटणार नाही. प्रशासनाने आधी अधिकृत फेरीवाला क्षेत्रे निश्चित करून त्यांना परवाने, ओळखपत्रे आणि व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्याव्यात. ज्या विक्रेत्यांचे पुनर्वसन शक्य आहे, त्यांना पर्यायी जागा देणे आवश्यक आहे.

श्याम ठाणेदार, दौंड, जिल्हा पुणे

 

Related Articles