भारताचा विजय पावसामुळे लांबला   

पसींदूचे शतक हुकले; फॉलोऑननंतर श्रीलंकेच्या 6 बाद 229 धावा; 16 धावांची आघाडी 

कोलंबो : दुसर्‍या कसोटीत फॉलोऑन मिळाल्यानंतर श्रीलंकेने भारताच्या विजयाचा मार्ग रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पसींदू सोरियाबंडाराच्या झुंजार 92 धावांच्या खेळीमुळे त्यांची डावाने पराभवाची नामुष्की टळली. मात्र मानव सुथारच्या प्रभावी फिरकीसमोर मधली फळी कोसळल्याने श्रीलंका अडचणीत सापडली आहे. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने दुसर्‍या डावात 6 बाद 229 धावा केल्या असून,  त्यांच्याकडे केवळ 16 धावांची आघाडी आहे. पावसामुळे दिवसाचा खेळ वेळेपूर्वी थांबवावा लागला.
 
भारताने पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 89.4 षटकांत 290 धावांत आटोपल्याने भारताला 213 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यामुळे यजमानांवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली. दुसर्‍या डावात सुरुवातीला श्रीलंकेची अवस्था डळमळीत होती. मात्र, दुसरीच कसोटी खेळणार्‍या पसींदू सोरियाबंडारा भारतीय गोलंदाजांना धैर्याने सामोरे गेला. त्याने कामिल मिशारासोबत दुसर्‍या विकेटसाठी 58, तर कामिंदू मेंडिससोबत तिसर्‍या विकेटसाठी तब्बल 115 धावांची भागीदारी केली. एकवेळ श्रीलंकेची अवस्था 3 बाद 209 अशी होती. भारताच्या पहिल्या डावाच्या तुलनेत यजमान अवघ्या चार धावांनी मागे होते आणि सात विकेट शिल्लक होत्या. त्यामुळे श्रीलंकेला सामन्यात पुनरागमन करण्याची आशा निर्माण झाली.
 
सुथारने फिरवला सामना
 
श्रीलंकेच्या प्रतिकाराला मानव सुथारने सुरुंग लावला. त्याने कर्णधार धनंजया डी सिल्व्हाला 23 धावांवर बाद केल्यानंतर सोरियाबंडारालाही तंबूत धाडले. आपल्या पहिल्याच कसोटी शतकापासून अवघ्या आठ धावांवर तो बाद झाला. 173 चेंडूंच्या खेळीत त्याने 10 चौकार आणि एका षटकारासह 92 धावा केल्या. यानंतर सारांश जैनने निरोशन डिकवेलाला सहा धावांवर पायचीत केले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था 6 बाद 229 अशी झाली. कामिंदू मेंडिसने 55 धावांची संयमी खेळी केली; मात्र त्याचे अर्धशतकही संघाला संकटातून बाहेर काढू शकले नाही. पावसामुळे अखेर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. सोनल दिनुशा 7 आणि केशरा नुवनथा 3 धावांवर नाबाद आहेत.  भारताकडून सुथारने दोन, तर प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, सारांश जैन आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे. आता श्रीलंकेकडे केवळ 16 धावांची आघाडी असून, अंतिम दिवशी उर्वरित चार फलंदाजांना बाद करून सामना जिंकण्याची संधी भारतासमोर आहे.
 
संक्षिप्त धावफलक
 
भारत : 9 बाद 503 डाव घोषित.
श्रीलंका : 290 व (फॉलोऑन) 6 बाद 229  - कामिल मिशारा 32, पसींदू सोरियाबंडारा 92, कामिंदू मेंडिस 55; मानव सुथार 2-81.

Related Articles