जनगणनेसाठी नवी प्रश्नावली तयार करा   

खर्गे आणि राहुल यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

नवी दिल्ली : जनगणनेत आता जात आणि आधारचे तपशील समाविष्ट केले जाणार आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. केंद्र सरकारने जनगणनेसाठीची सध्याची प्रश्नावली रद्द करावी आणि राजकीय पक्ष, तज्ज्ञ व सामान्य जनतेशी चर्चा करून नवीन प्रश्नावली तयार करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 
सध्याच्या पद्धतीने केली जाणारी जातिनिहाय जनगणना आम्हाला मान्य नाही, असे खर्गे आणि राहुल यांनी म्हटले आहे. तसेच, तेलंगणा आणि बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातीविषयक पाहणीचा आदर्श सरकारने घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
 
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २० ऑगस्ट रोजी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले असल्याची माहिती पत्रकारांना दिली. या मुद्द्यावरून काँग्रेस नेतृत्वाने पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले हे तिसरे पत्र आहे. मात्र, अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही, असे रमेश यांनी नमूद केले. 
 
केंद्र सरकारकडून जनगणना २०२७ साठी नुकतीच अधिसूचना जाहीर करण्यात आली. बर्फाळ प्रदेशात १ सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या जनगणनेत ४० प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये जात आणि आधारचा तपशील समाविष्ट असणार आहे.
 
देशाचे रजिस्ट्रार जनरल मृत्युंजय कुमार नारायण यांच्या आदेशानुसार, नागरिकांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर कोणत्या जातीचे आहेत, याबाबत माहिती विचारली जाणार आहे. तसेच, संबंधित व्यक्तीची विशिष्ट जात कोणती आहे, याचीही नोंद केली जाणार आहे.

Related Articles