थकित बिलांसाठी राज्यातील कंत्राटदार राज यांच्या दारी   

मुख्यमंत्र्यांनाही भेटणार

मुंबई, (प्रतिनिधी) : शासकीय बिले थकलेल्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शासकीय कंत्राटदारांचे राज्य सरकारकडून ८६ हजार ६६४ कोटींची देयके येणे अद्याप बाकी आहे. कंत्राटदारांच्या संघटनेने आंदोलनही सुरू केले आहे. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधू. तुम्हाला सोबत घेऊन त्यांची भेटही घेऊ, असे आश्वासन राज यांनी या कंत्राटदारांना दिले आहे. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुजरातवरून आलेल्या कंत्राटदारांची देयके कशी मंजूर होतात? स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय का? असा सवाल यावेळी केला.
 
राज्यात सुमारे ३० हजारांच्या आसपास शासकीय कंत्राटदार आहेत. या कंत्राटदारांची राज्य सरकारकडून ८६ हजार ६६४ कोटींची देयके थकलेली आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी आंदोलनही सुरू केले आहे. या कंत्राटदारांच्या शिष्टमंडळाने काल राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. 
 
आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. राज यांनी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधू व त्यांच्यासोबत तुमची भेट घालून देऊ, असे आश्वासन दिल्याचे कंत्राटदारांच्या प्रतिनिधींनी माध्यमांना सांगितले. मागच्या निवडणुकीच्या वेळी आमच्या कामांमुळेच हे सरकार निवडून आले असल्याचा दावाही त्यांनी केला. सर्वाधिक बिले ही जलजीवन मिशनची बाकी आहेत. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांची बिले बाकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आम्ही सर्व मराठी आहोत. आमच्याकडे काम करणारे लोकही मराठीच आहेत. सुमारे ५ ते ७ लाख लोक आमच्याकडे काम करतात. मग भूमिपुत्रांवर अन्याय का? असा सवाल कंत्राटदारांनी केला.

गुजराती कंत्राटदारांवर सरकार मेहेरबान 

जे गुजराती कंत्राटदार मुंबई, महाराष्ट्रात काम करतात, त्यांची बिले तातडीने मंजूर करण्यात येतात. मराठी भूमिपूत्रांवर मात्र अन्याय करण्यात येतो. दिल्लीने सांगितलेल्या गुजराती कंत्राटदारांची सर्व बिले मंजूर होतात, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

Related Articles