मंचर-भीमाशंकर रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे साम्राज्य   

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

भीमाशंकर (वार्ताहर) : मंचर ते क्षेत्र भीमाशंकर या प्रमुख पर्यटन व तीर्थक्षेत्राला जोडणार्‍या मुख्य रस्त्याच्या कडेला, घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीत सध्या कचर्‍याचे मोठे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरली असून यामुळे पादचारी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नाकाला रूमाल लावून जावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या या कारभाराविरुद्ध नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
भीमाशंकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सहावे ज्योतिर्लिंग असल्याने या मार्गावरून दररोज शेकडो भाविक आणि पर्यटकांची वाहने जात असतात. मात्र घोडेगाव हद्दीत प्रवेश करताच रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्यात साचलेला सुका व ओला कचरा व उघड्यावर टाकलेले टाकाऊ पदार्थ पर्यटकांचे स्वागत करत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर कचर्‍याची अशी विल्हेवाट लावली जात असल्याने परिसराची मोठी बदनामी होत आहे. रस्त्याच्या कडेला कचरा कुजल्यामुळे प्रचंड दुगंधी सुटली आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून कचरा रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 
 
घोडेगाव ग्रामपंचायतीला अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने प्रभारी ग्रामसेवकांकडे पदभार आहे. आंबेगाव तालुक्यात सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून घोडेगाव ग्रामपंचायतीकडे पाहिले जात असल्याने येथे पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
 

Related Articles