मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान; मदतीची मागणी   

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विशेषतः आदिवासी भागातील शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगर उतारावरील शेतांमधून पाण्याचे प्रचंड लोंढे वाहिल्याने अनेक ठिकाणी ओढे तयार झाले असून सुपीक माती वाहून गेली आहे. त्यामुळे अनेक शेतांमध्ये पेरणी केलेली पिके धोक्यात आली असून भविष्यात उत्पादनावरही मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
महसूल व कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असले तरी केवळ पंचनामे करून प्रश्न सुटणार नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाकडून मिळणारी नियमित मदत शेती पूर्ववत करण्यासाठी अपुरी ठरणार असल्याचे मत शेतकरी मांडत आहेत. वाहून गेलेली माती परत भरणे, बांधबंदिस्ती करणे, शेत समतल करणे आणि सिंचन व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे किंवा शेती सुधार योजनेअंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. शेती पुन्हा उभी राहण्यासाठी तातडीने मदत मिळाल्यास आदिवासी शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
पावसाच्या पाण्याबरोबर शेतातील सुपीक मातीही वाहून गेली. केवळ पंचनामे करून उपयोग नाही. शेती पुन्हा उभी करण्यासाठी शासनाने विशेष आर्थिक मदत किंवा शेती सुधार योजनेतून तातडीने साहाय्य द्यावे.
 
-  बुधाजी डामसे, शेतकरी
 

Related Articles