प्रशांत किशोर विजयी   

बांकीपूरमध्ये ‘जन सुराज’ने खाते उघडले; भाजपला धक्‍का

पाटणा : बिहारमधील बांकीपुरा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निवडणूक रणनीतिकार आणि ’जन सुराज’ पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सोमवारी घवघवीत विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा सुमारे 19 हजार मतांनी पराभव केला आहे. बिहारमध्ये गेल्या वर्षी 2025 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील जन सुराज पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ सोडला होता. त्या पार्श्‍वभूमीवर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली.  
 
बांकीपूर मतदारसंघ भाजपचा गड मानला जात होता. तेथे प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे भाजपला मोठा धक्‍का बसल्याचे मानले जात आहे. कारण गेल्या 31 वर्षांपासून हा मतदारसंघ भाजप जिंकत आला होता.  दरम्यान, मतदारसंघात भाजप, जन सुराज पक्ष आणि राजद अशी प्रमुख तिहेरी लढत होती. मात्र, खरी लढत प्रशांत किशोर आणि नीरज कुमार सिन्हा यांच्यातच होती. विधानसभा निवडणुकीतील पराजयाचे रूपांतर विजयात करणारे आणि जन सुराज पक्षाचे पहिले आमदार होण्याचा मानही प्रशांत यांना आता मिळाला आहे.  पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रशांत किशोर यांचा विजय होईल, असे भाकित अनेकांनी व्यक्‍त केले होते. तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी नीरज कुमार यांचा दबदबा कमी होता. राजदच्या रेखा कुमारी तिसर्‍या क्रमांकावर फेकल्या गेल्या. प्रशांत यांना 64 हजार 151, नीरज यांना 44 हजार 827, रेखा कुमारी यांना 14 हजार 273 मते पडली.
 
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आघाडी घेतली होती. पाहता पाहता निवडणूक रणनीतिकार ते राजकारणी बनलेले प्रशांत यांनी नीरज यांना मागे टाकले. मतमोजणीच्या 31 व्या फेरीत प्रशांत किशोर यांना 63 हजार 203 मते तर नीरज यांना 44 हजार 250 मते पडली होती. मतमोजणी सुरू असताना प्रशांत यांना अधिक मते पडत गेली. दोघांच्या मतांमधील  अंतर फारच वाढत गेले. किशोर यांचा विजय होत असल्याचे पाहताच  पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या आणि आनंदोत्सव सुरू केला. प्रशांत यांना अजूनही पाठिंबा मिळत आहे. जन सुराजचा सुवर्ण अध्याय पुन्हा सुरू झाला, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष मनोज भारती यांनी दिली. प्रशांत यांच्या विजयामुळे नितीश आणि मोदी यांची जादू चालली नसल्याचे चित्र दिसले. लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदची पुन्हा वाताहत झाली आहे. 
 
पोटनिवडणुकीच्या प्रचारात प्रशांत किशोर यांनी वेगळी रणनीती आखल्याचे चित्र होते. त्यांनी नागरिकांच्या भावनांना हात घालण्याऐवजी  शिक्षण, नोकर्‍या आणि नागरी समस्यांना वाचा फोडली आणि त्यांचा विजय झाला, असे मानले जात आहे. किशोर हेच योग्य उमेदवार आहेत, अशी खात्री बांकीपूरच्या मतदारांना देण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी प्रचारात मोहल्‍ला बैठका घेण्यावर आणि नागरिकांशी सुसंवाद साधण्यावर अधिक भर दिला. तसेच भाजपच्या स्थानिक पातळीवरील काही मतभेद आणि अंतर्गत कलहाचा फायदा घेत त्यांनी भाजपचे ’सामाजिक समीकरण’ मोडून काढण्यात यश मिळवले.
 
बांकीपूरमधील निकालाकडे भाजपविरोधातील त्या व्यापक असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर पाहिले पाहिजे. जो विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमधून नुकताच दिसून आला होता. अर्थात, याचे श्रेय प्रशांत किशोर यांनाही दिले पाहिजे, ज्यांनी प्रचंड ऊर्जा आणि संघटनात्मक कौशल्ये पणाला लावली, असे ज्येष्ठ समाजवादी नेते शिवानंद तिवारी यांनी म्हटले. तिवारी हे 1970 च्या दशकातील ’जेपी आंदोलना’तील प्रमुख सहभागींपैकी एक होते आणि अनेक दशकांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी  राजद आणि जेडीयू यांसारख्या पक्षांसोबत काम केले आहे.
 
भाजपचा 30 वर्षांचा बालेकिल्ला अवघ्या 30 दिवसांत ढासळला...
 
भाजपचा 30 वर्षांचा बालेकिल्‍ला अवघ्या 30 दिवसांत ढासळवला आहे. ही केवळ आमदार निवडून आणण्याची निवडणूक नाही, तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला हा संदेश देण्याची निवडणूक आहे की, बिहारमध्ये एखाद्या चांगल्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवले जावे, जेणेकरून राज्यात शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील; जनतेने हाच संदेश दिला आहे. ज्यांनी मतदान केले त्यांचे मी आभार मानतो आणि ज्यांनी केले नाही, त्यांनाही जिंकण्याचा मी प्रयत्न करेन... पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहारला चांगले नेतृत्व मिळायला हवे... येथून होणारे स्थलांतर थांबले पाहिजे असे ’जन सुराज’ पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सांगितले.

Related Articles