जाणत्या लेखकाइतकाच जागरूक वाचक महत्वाचा : प्रतिभा रानडे   

पुणे : लेखकाला आणि वाचकालादेखील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक वास्तवाची पूर्ण जाण असायला हवी. जागरूक वाचक, समीक्षक समाजात असतील तर त्यांचा धाक लेखकांना वाटू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी रविवारी केले. राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति संशोधन केंद्र यांच्या सहयोगाने दिला जाणारा श्री. ग. माजगावकर पुरस्कार त्यांना एका अनौपचारिक कार्यक्रमात देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
लेखिका म्हणून मी समाजापुढे आले ते श्रीभाऊंमुळे, असे सांगून रानडे म्हणाल्या, स्वतःला कोणत्याही विशिष्ट विचारधारेशी बांधून न घेता सभोवतालच्या माणसांच्या, विशेषतः स्त्रियांच्या दुःखाशी जोडून घेत मी लिहीत राहिले. जीवनाबद्दल, आजूबाजूच्या निसर्गाबद्दल, वास्तवाबद्दल मला सतत कुतूहल वाटत आले, अनेक प्रश्‍न पडत राहिले आणि त्या प्रश्‍नांचा शोध घेण्यासाठी मी लिहीत राहिले.
 
आज राजकारण, समाजकारण, धर्मकारण, असल्या सगळ्या कारणांनी माणसाचा अक्षरशः चोळामोळा करून टाकला आहे; त्याच्या सगळ्याच संवेदना बोथट करून टाकल्या आहेत, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी पुरस्कारामागची भूमिका सांगितली. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर म्हणाले, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता विषयाचा तटस्थतेने अभ्यास करून प्रतिभाताईंनी आजवर लेखन केले आहे. डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृति संशोधन केंद्राच्या सचिव वर्षा गजेंद्रगडकर, लेखिका डॉ. वंदना बोकील, कवयित्री दीपाली दातार यावेळी उपस्थित होत्या.

Related Articles