तृतीयपंथीयांच्या जीवनात ‘टीजी प्रमाणपत्रा’मुळे आशेचा किरण   

शिक्षण, आरोग्य आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर

अजिंक्य एकाड
 
पुणे : समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्षे दूर राहिलेल्या तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागाने हाती घेतलेली ‘टीजी प्रमाणपत्र’ नोंदणी मोहीम तृतीयपंथ्यांच्या आयुष्यात नवा आशावाद निर्माण करत आहे. अधिकृत ओळख नसल्यामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या तृतीयपंथीयांसाठी हा उपक्रम सन्मानाने जगण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
 
जिल्ह्यात तृतीयपंथीयांची संख्या सुमारे पाच ते सहा हजारांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. समाज कल्याण विभागाकडे आतापर्यंत 1 हजार 203 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी तब्बल 1 हजार 150 प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहेत.तृतीयपंथीयांचा स्थिर पत्ता नसणे, सततचे स्थलांतर, कागदपत्रांचा अभाव आणि समाजातील भेदभाव यामुळे त्यांची अधिकृत नोंदणी करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. या पार्श्‍वभूमीवर समाज कल्याण विभागाने आपल्या अखत्यारीतील 26 वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील गृहपाल, गृहप्रमुख तसेच अन्य कर्मचार्‍यांचे जाळे या मोहिमेसाठी सक्रिय केले आहे.
 
हे कर्मचारी विविध वस्त्या, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन तृतीयपंथीयांशी थेट संवाद साधतात. त्यांना विश्‍वासात घेऊन टीजी प्रमाणपत्राचे महत्त्व आणि त्यातून मिळणार्‍या शासकीय लाभांची माहिती देतात. त्यानंतर संबंधित व्यक्तींना समाज कल्याण कार्यालयात आणले जाते किंवा त्यांच्या सोयीच्या ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते.ही मोहीम राबविताना तृतीयपंथीयांची वैयक्तिक माहिती आणि ओळख गोपनीय ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. समुदायातील काही व्यक्ती अल्पवयीन असून काही जण महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. सामाजिक भेदभाव किंवा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाकडून अत्यंत संवेदनशीलतेने नोंदणी प्रक्रिया राबविली जात आहे.
 
संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान
 
विशेष शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रे संकलित करून ऑनलाइन नोंदणी करण्यात येते. त्यानंतर अधिकार्‍यांकडून पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत प्रमाणपत्र आणि लॅमिनेटेड ओळखपत्र वितरित केले जाते. त्यामुळे शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेर्‍या मारण्याची आवश्यकता कमी झाली असून संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान झाली आहे.
 
प्रमाणपत्राचा असा होत आहे फायदा
 
अधिकृत टीजी प्रमाणपत्रामुळे तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करणे शक्य होत आहे. मोफत शिक्षण, शासकीय रुग्णालयांतील आरोग्य सुविधा, रेशन कार्ड, निवारा योजना, स्वयंरोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षण, बँक खाते उघडणे तसेच इतर अनेक प्रशासकीय कामांसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्याचबरोबर, अधिकृत ओळख मिळाल्यामुळे समाजात सन्मानाने वावरण्याचा आत्मविश्‍वासही वाढत असल्याचे लाभार्थी सांगत आहेत.
 
प्रत्येक तृतीयपंथी नागरिकाने स्वतः पुढे येऊन हे प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने हे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाते. या प्रमाणपत्रामुळे तृतीयपंथीयांसाठी लागू असलेल्या सर्व शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
- विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे
 
प्रमाणपत्र मिळणे ही चांगली बाब असली, तरी तृतीयपंथीयांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय नोकर्‍यांमध्ये समान संधी मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये आमचा समान सहभाग असावा. महिलांप्रमाणेच तृतीयपंथीयांसाठीही सार्वजनिक वाहतुकीत सवलतीचा विचार व्हायला हवा.
-डॉ. मिलन लांबा, रेनबो रूट फाउंडेशन

Related Articles