आळे-बोरी बुद्रुक रस्त्यावर खड्डेच खड्डे;रस्ता गेला कुठे?... वाहनचालकांचा संताप   

बेल्हे, (वार्ताहर) : आळे-बोरी बुद्रुक या महत्त्वाच्या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिस्थिती अशी आहे की, रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, असा प्रश्‍न वाहनचालकांना पडू लागला आहे.सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून रस्ता आणि खड्डा यातील फरकच ओळखता येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, मोटार चालक आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना दररोज मोठी कसरत करावी लागत असून अनेकदा वाहनांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत.
 
गेल्या काही दिवसांत या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघात घडले असून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.हा रस्ता परिसरातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून होत आहे. रस्ता दुरुस्त होणार कधी? हा प्रश्‍न आता प्रत्येक वाहनचालकाच्या मनात निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles