वाचक लिहितात   

पाणी अडविण्याची गरज 
 
यंदा मान्सून उशिरा सुरू झाला. मध्य महाराष्ट्रात गेले काही दिवस पाऊस पडत आहे. गेल्या काही वर्षांतील पावसाचे चित्र पाहिल्यास आपणास असे दिसते की, पाऊस एकदम जास्त किंवा जोराचा पडतो. पूर्वी जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होत असे. काही भागात पाऊस झाला नाही किंवा जेथे झाला तेथे तो पिकांना पुरेसा नाही. यावर पाणी अडवा, पाणी जिरवा  मोहीम जोराने राबविणे जरुरीचे आहे. कोयनेसारख्या धरणातून दरवर्षी मोठ्या प्रमाणातून विसर्ग करावा लागतो. शेतात शेततळी किंवा खड्डे तयार करणे हे काम हाती घेता येईल. महाराष्ट्रात शेतातील तळी बर्‍याच शेतकर्‍यांनी बांधली आहेत. राहिलेल्या शेतकर्‍यांनी ती बांधावीत अशी अपेक्षा आहे. लहान नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवावे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, ही वृक्षारोपणाची मोहीम तीव्र करावी. यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविता येते. आज महाराष्ट्रात देशातील जास्तीत जास्त धरणे आहेत. तरीसुद्धा काही भागात पाऊस संपल्यानंतर टँकर चालू करावे लागतात. असे उपाय योजल्यास विहिरीतील पाण्याची पातळी वाढते. पाण्याचा पुरवठा कायम वर्षभर मिळू शकतो. 
 
शांताराम वाघ, पुणे 
 
खालावलेली नैतिकता
 
आता रेल्वेच्या वातानुकूलीत डब्यातून झोपण्यासाठी चादर, उशी, ब्लँकेट सर्व काही मिळते. खाणे-पिणे, मोबाइल चार्ज करण्याची सोय अशा सगळ्याच सुखसोई आहेत, त्याविषयी यंत्रणेचे आभार मानायला हवेत; पण प्रवासीच दिलेली अंथरूण पांघरूण पळवतात असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे; सहकार्य करण्याच्या ऐवजी यंत्रणेला अडचणीत आणणे हे उपकाराची फेड अपकाराने करणे अशासारखे आहे. ऑनलाइन व्यवहाराची सोय आहे; पण फसवणुकीचे धोकेही तितकेच वाढले आहेत. त्यामुळे समाज स्वास्थ्यासाठी केवळ भौतिक प्रगती पुरेशी नाही. माणसाने नीतिमानता जोपासायला हवी.
 
संध्या काटदरे, माणगाव, रायगड
 
मद्यपानात कर्नाटकची आघाडी!
 
देशांतील दरडोई मद्यसेवन जास्त असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटकचा समावेश होत असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 मधील आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यांतील प्रत्येक व्यक्ती वर्षाला सरासरी 9.1 लीटर मद्यसेवन करत आहे. हा आकडा देशाच्या 6.4 लीटर सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे. त्यामुळे कर्नाटकसाठी ही धोक्याची घंटा असू शकते. याचा सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. दक्षिण भारतातील पाच राज्यांच्या देशांतील एकूण मद्य विक्रीत सुमारे 45 टक्के वाटा असून त्यात कर्नाटकचे स्थान महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकांचे वाढते उत्पन्न, बदलती जीवनशैली, वेगाने होणारे शहरीकरण, खर्च करण्याच्या पद्धतीतील बदल, तसेच समाजात मद्यपानाला वाढती स्वीकारार्हता यांसारख्या कारणांमुळे मद्यसेवन वाढत आहे, मात्र ते घातक ठरते.
 
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव  
 
संवादाला उशीर
 
नीट पेपरफुटीप्रकरणी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’पेपरफुटी हे घोर पाप’ असल्याचे म्हटले आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आश्‍वासन दिले. ही भूमिका स्वागतार्ह असली तरी ती थोडी उशिरा आल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. गेल्या सुमारे वीस दिवसांपासून जंतरमंतरवर विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत होते. तेव्हा सरकारकडून असा स्पष्ट संदेश गेला असता, तर विद्यार्थ्यांचा विश्‍वास अधिक दृढ झाला असता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या लाठीमार आणि अश्रुधुराच्या कारवाईनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि त्यानंतरच पंतप्रधानांची प्रतिक्रिया समोर आली. त्यामुळे सरकारने सुरुवातीलाच संवाद साधून विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या असत्या, तर हा वाद इतका चिघळला नसतो. 
 
दीपक गुंडये, वरळी.
 
वाढते शहरीकरण रोखा
 
महात्मा गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा संदेश देताना भारताचा आत्मा खेड्यांत वसतो, ही भूमिका मांडली होती. त्यांच्या या विचारामुळे ग्रामीण विकासाला महत्त्व प्राप्त झाले; मात्र आजची परिस्थिती याच्या अगदी उलट दिसून येते. रोजगार, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि इतर मूलभूत सुविधांच्या शोधात ग्रामीण भागातील हजारो नागरिक दररोज शहरांकडे स्थलांतर करत आहेत. परिणामी शहरांवर लोकसंख्येचा प्रचंड ताण वाढत आहे. ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर थांबवायचे असेल, तर तेथील नागरिकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. शेतीला लाभदायक व्यवसाय बनविण्यासाठी शेतमालाला हमीभाव, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ग्रामीण विकासालाच प्राधान्य देणे, हे वाढत्या शहरीकरणावर नियंत्रण मिळविण्याचे सर्वांत प्रभावी साधन आहे. गावे सक्षम आणि स्वयंपूर्ण झाली, तरच शहरांवरील वाढता ताण कमी होईल.
 
श्याम ठाणेदार, दौंड, जि. पुणे

Related Articles