भोंगवलीमध्ये सोलर उपकेंद्रात जाळपोळ   

कामगारांना मारहाण; लाखो रुपयांच्या यंत्रांचे नुकसान

भोर, (वार्ताहर) : भोंगवली येथील सोलर पॉवर उपकेंद्राची जमावाने जाळपोळ करून लाखो रुपयांच्या मशिनरीचे मोठे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी पहाटे एक ते दोनच्या सुमारास घडली. जाळपोळीबरोबर हातात तलवार, कोयते, पिस्तुल घेतलेल्या जमावाने कामगारांचे मोबाईल हिसकावून घेऊन मारहाण केली केली. त्यामुळे भयभीत झालेले काही कामगार रातोरात पळून गेले. तर पेट्रोल व डीझेल अंगावर ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कंपनीच्या व्यवस्थापकाने केला आहे.
 
जीएस पुणे थ्री ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने गावापासून एक किलोमीटर अंतरावर सुमारे शंभर एकरात 765/400 केव्ही सोलर वीज उपकेंद्र व उच्चदाब वाहिनीचे काम सुरू आहे. केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यातून निर्माण होणारी वीज देशातील विविध राज्यांत पोहचवण्यासाठी आंतरराज्य वीज वहन जाळे विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाचे काम  विश्‍वासात न घेता प्रशासनाला हाताशी धरून सुरू केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. स्थानिकांना विश्‍वासात न घेता परस्पर जमिनीचे खोदकाम, वृक्षतोड, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी प्रकार कंपनीने केल्याचे कृती समितीने सांगितले. शनिवारी केलेल्या जाळपोळीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. जमावाने दोन चारचाकी वाहने, कार्यालय, विजेची उपकरणे, शेड, केबल, डंपरची जाळपोळ केली आहे. खबर मिळताच घटनास्थळी राजगड पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला.
 
दरम्यान प्रातांधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कंपनीचे व्यवस्थापक सुधीर पिसाळ यांनी सांगितले की, पोलीस बंदोबस्तात आमचे काम दररोज सुरू आहे. या जाळपोळीत फार मोठे नुकसान झाले असून हल्ल्यामुळे कामगारांमध्ये भीती आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले की, सुमारे 50 ते 60 जणांच्या जमावाने  हल्ला केला आहे. यामध्ये सुरक्षारक्षक व कामगारांना मारहाण केली आहे. घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फूटेज, रेकॉर्डचे नुकसान केले आहे. मात्र काही डीव्हीआर सुरक्षित असून त्याच्या आधारे पुढील तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.    
 
घटनेचा निषेध
 
घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी व निंदनीय आहे. त्याचे समर्थन करता येणार नाही. तपासामध्ये जे कोणी असतील ते निष्पन्न होईल. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल. स्थानिक व परिसरातील लोकांना विश्‍वासात न घेता कंपनीने प्रकल्पाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू केले आहे. त्याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मुख्यमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे शुक्रवारी लेखी निवेदन देऊन काम तात्काळ थांबवावे अशी मागणी केली आहे. शांतता व कायदेशीर मार्गाने स्थानिकांचे हित व हक्कासाठी काम करणार असल्याचे ‘भोर, राजगड सबस्टेशन व टॉवर लाईन हटाव संघर्ष कृती समिती’चे अध्यक्ष संग्राम थोपटे सांगितले. यावेळी समितीचे रोहन बाठे, बाळासाहेब शेडगे, विठ्ठल गायकवाड, नितीन शेडगे आदी उपस्थित होते.

Related Articles