आजचा भारत शत्रूच्या घरात घुसून उत्तर देतो   

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात आमूलाग्र बदल झाला आहे. भारत आता केवळ हल्ले सहन करणारा देश राहिलेला नसून, शत्रूच्या घरात घुसून उत्तर देणारा देश बनला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या अजित डोवाल यांचा राजकीय क्षेत्रातील चाणक्य अमित शहा यांच्या हस्ते सन्मान होणे हा दुग्धशर्करा योग आहे. एका धुरंधराच्या हस्ते दुसर्‍या धुरंधराचा गौरव होत असल्याने या पुरस्कार सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचेही ते म्हणाले.  
 
अजित डोवाल यांनी पोलिस सेवा, गुप्तचर विभाग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून देशासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करताना फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे धोरण बदलून ‘प्रोअ‍ॅक्टिव्ह डिटरन्स’ची भूमिका स्वीकारण्यात आली. संकट आल्यानंतर केवळ प्रतिक्रिया देण्याऐवजी संभाव्य धोक्याला आधीच प्रतिबंध करणे आणि शत्रूला त्याच्याच भूमीत प्रत्युत्तर देण्याची क्षमता निर्माण करणे, हा या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या बदलामुळे भारताच्या सामरिक सामर्थ्याला आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
 
लोकमान्य टिळकांच्या कार्याचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर भारतीय समाजामध्ये निर्माण झालेली निराशा दूर करण्याचे काम लोकमान्यांनी केले. ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, हा मंत्र देत त्यांनी देशवासीयांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली. ब्रिटिशांनी त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले असले तरी ते खर्‍या अर्थाने भारतीय राष्ट्रवादाचे जनक होते. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी जाती-पातींमध्ये विभागलेल्या समाजाला एकत्र आणले. या उत्सवांना सामाजिक अभिसरण आणि राष्ट्रजागृतीचे स्वरूप देत स्वातंत्र्यलढ्याची मशाल सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.अजित डोवाल यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे. तसेच, त्यांच्या हातून पुढील अनेक वर्षे राष्ट्रसेवा घडावी, अशी प्रार्थनाही फडणवीस यांनी यावेळी केली.
 
• राष्ट्रीय सुरक्षेमध्ये रौप्यपदक नसते. तुम्ही जिंकलात तर इतिहास घडवता आणि हरलात तर स्वतः इतिहासजमा होता, या डोवाल यांच्या विचाराचा उल्लेखही फडणवीस यांनी केला. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आणि कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता डोवाल यांनी देशासाठी कार्य केले आहे. एवढी मोठी कामगिरी करूनही त्यांच्यातील नम्रता कायम असल्याने ते देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Related Articles