आसाममधील पूरबळींची संख्या 80 वर   

दोन लाखांहून अधिक नागरिकांना फटका

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती भयावह बनली आहे. राज्यात पूरबळींची संख्या 80 वर पोहोचली असून, दोन लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.दरम्यान, राज्य सरकारने पूरग्रस्तांनी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांची परतफेड करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. यासोबतच, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी केंद्र सरकारकडे विशेष पॅकेजची मागणीही केली आहे. 
 
गोलाघाट, शिवसागर, विश्‍वनाथ, चराईदेव, कामरूप, जोरहाट, धेमाजी आणि नागाव या आठ जिल्ह्यांतील 21 महसूल मंडळांतील 437 गावांना पुराने वेढा घातला आहे. या भागातील 2 लाख 12 हजार 400 हून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पुराचा सर्वाधिक फटका चराईदेव जिल्ह्यातील 80 हजार नागरिकांना बसला आहे. त्यानंतर शिवसागर (71 हजार) आणि जोरहाट (40 हजार) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. मागील दोन दिवसांत पूरस्थितीत सुधारणा झाली आहे. बुधवारी सात जिल्ह्यांतील 3 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला होता.
 
प्रशासनाने चार जिह्यांत 112 निवारा केंद्रे उभारली आहेत. या ठिकाणी 75 हजारांहून अधिक जणांनी आश्रय घेतला आहे. बचाव आणि मदतकार्यात लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, पोलिस आणि विविध नागरी संस्था सहभागी झाल्या आहेत. राज्यात 17,198.09 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पुरामुळे अनेक रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त परिसरातील कर्जदारांसाठी बँकांच्या वरिष्ठ प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत पूरग्रस्त परिसरातील कर्जदारांसाठी विशेष योजना जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Related Articles