निर्भीड पत्रकारितेचा मानदंड (अग्रलेख)   

‘अन्यायाच्या गोष्टी लोकांस नीट समजावून देऊन त्याबद्दल लोकमत जागृत करणे व त्यास कायदेशीर दाद मागण्यास सांगणे हे प्रत्येक वर्तमानपत्र कर्त्याचे कर्तव्य आहे. यात राज्यास अपाय होण्यासारखे काही एक नाही.’
 
स्वराज्याची सिंहगर्जना करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप देणारे लोकमान्य टिळक हे केवळ भूतकाळातील इतिहासपुरुष नाहीत, तर आजच्या एकविसाव्या शतकातही त्यांचे विचार तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक ठरतात. आज आपला देश ज्या आव्हानातून जात आहे त्या पार्श्‍वभूमीवर लोकमान्यांच्या विचारांचे पुन्हा चिंतन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘केसरी’ आणि ‘मराठा’च्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीचे काम केले. ‘केसरी’ निर्भय वृत्तीने हे कर्तव्य बजावेल असे त्यांनी म्हटले होते. 4 जुलै 1899 च्या ‘पुन:श्‍च हरीओम’ या गाजलेल्या अग्रलेखातून ते म्हणाले होते की, ‘केसरी कशाचीही भीती न वाटता तो सदैव आपल्या कर्तव्यास जागृत राहिल्यास त्यात काही नवल नाही. किंबहुना अशा रीतीने वर्तन ठेवणे हेच त्याचे कर्तव्य आहे, असे म्हटले तरी चालेल.’ त्या अग्रलेखास त्यांच्या विरुद्धच्या पहिल्या राजद्रोहाच्या खटल्याची पार्श्‍वभूमी होती. ब्रिटिश सरकारने तत्कालीन कायदा बदलताना ‘राजद्रोह’ हा शब्द काढून त्या ऐवजी ‘देशद्रोह’ शब्द आणला होता. राज्यकर्ते बदलले; पण मानसिकता बदलली का? हा प्रश्‍न आजही अनुत्तरित राहतो. ‘राजद्रोह कशाला म्हणतात’ या अग्रलेखात लोकमान्य म्हणतात ’सरकार किंवा सरकारी अधिकारी यांच्या वर्तनाबद्दल नाखुशी प्रदर्शित करणे हा राजद्रोह ठरत नाही. आमच्या राज्यकर्त्यांनी काही शहाणपणाचा मक्ता घेतलेला नाही. त्यांचे बळ व सामर्थ्य कितीही असले तरी पुष्कळ वेळा एखाद्या पोराप्रमाणे त्यांच्या हातून चुका घडून त्यामुळे रयतेस त्रास सोसावा लागतो, हे उघड आहे व असा त्रास जोपर्यंत होत आहे, तोपर्यंत त्याचे चांगले निरूपण करून लोकांस त्याबद्दल सरकारात दाद मागण्यास सांगणे यात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम होत नाही.’ (राजद्रोह कशाला म्हणतात, केसरी अग्रलेख 20 जुलै 1897). ‘अन्यायाच्या गोष्टी लोकांस नीट समजावून देऊन त्याबद्दल लोकमत जागृत करणे व त्यास कायदेशीर दाद मागण्यास सांगणे हे प्रत्येक वर्तमानपत्र कर्त्याचे कर्तव्य आहे. यात राज्यास अपाय होण्यासारखे काही एक नाही.’ 
 
सामाजिक जबाबदारीचे भान
 
‘केसरी’च्या माध्यमातून लोकमान्यांनी अग्रलेखाद्वारे इंग्रज सरकारवर परखड ताशेरे ओढले. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ असा सवाल विचारण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्यांच्यासाठी पत्रकारिता हे व्यवसायाचे साधन नव्हते तर लोकजागृतीचे आणि सामाजिक जबाबदारीचे माध्यम होते. लोकमान्यांची तत्त्वनिष्ठ, निर्भीड आणि जनहिताला प्राधान्य देणारी पत्रकारिता आजच्या माध्यमांसाठी दीपस्तंभासारखी आहे. 1910 मध्ये इंग्रजांनी आणलेल्या ‘प्रेस अ‍ॅक्ट’ कायद्याने मुद्रण स्वातंत्र्यावर घाला घातला. त्यामुळे वर्तमानपत्रकर्त्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. लोकमान्यांनी ‘कोळसा उगाळला तरी काळाच’ या अग्रलेखातून सरकारच्या मानसिकतेवर प्रहार केले होते. त्या अग्रलेखात लोकमान्यांनी म्हटले होते ‘गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे रंजन करणे हे काही वर्तमानपत्रकर्त्याचे मुख्य कर्तव्य नव्हे.’ (केसरी अग्रलेख 13 मार्च 1917) लोकमान्यांची स्मृती जागवताना आजही त्यांच्या वैचारिक भूमिकेचे मोल जाणून घेण्याची गरज आहे. केसरी-मराठा वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या जनजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे कार्य बहुमोल आहे. सत्य बोलणे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हा वृत्तपत्र सृष्टीचा किंबहुना माध्यमांचा धर्म त्यांनी शिकवला. टिळकांचा सकारात्मक लोकसंग्रहाचा विचार समाजाला एकत्र जोडण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. लोकमान्यांचे विचार केवळ इतिहासातील सोनेरी पाने नाहीत तर वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्याला उज्ज्वल करणारा दीपस्तंभ आहे. राष्ट्रप्रेम, स्वावलंबन, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आणि सामाजिक एकता या टिळकांच्या विचारांची देशाला सर्वाधिक गरज आहे.

Related Articles