व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात 40हून अधिक नागरिक ठार   

आम्हाला पाकिस्तानच्या जुलमातून मुक्त करा... भारतीय लष्कराकडे मदतीची याचना 

मुझफ्फराबाद : पाकिस्तान सरकार आणि आसिफ मुनीर यांचे सैन्य व्याप्त काश्मीरमध्ये घटनात्मक आणि नागरी हक्कांसाठी सुरू असलेले आंदोलन दडपून टाकण्यावर ठाम आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानंतर आयोजित केलेला मुझफ्फराबाद मोर्चा थांबवण्यासाठी सुरक्षा दलांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात 40 हून अधिक नागरिक ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले.
 
पाकिस्तानी सरकार आणि सैन्य आमच्यावर अमानुष अत्याचार करत आहेत. भारतीय सैन्याने आम्हाला मदत करावी आणि आमची येथून सुटका करावी. पाकिस्तानच्या अत्याचारातून आमची मुक्तता करा. पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांनी त्रस्त असलेले, व्याप्त काश्मीरमधील नागरिक आता भारतीय सैन्याकडे आपली शेवटची आशा म्हणून पाहत आहेत.या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या जॉइंट आवामी अ‍ॅक्शन कमिटीच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष आणि प्रवक्ते उमर नझीर यांचे भाऊ उस्मान नझीर हे देखील पाकिस्तानी रेंजर्सच्या हातून मारले गेले. 
 
पाकिस्तानी हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या वडिलांचाही मृत्यू झाला आहे. काही स्थानिक सूत्रांनी असा दावा केला आहे की, जखमी आंदोलकांवर उपचार करणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांना धमक्या देण्यात आल्या किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.समाज माध्यमांवर फिरत असलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांमध्ये जखमी नागरिकांना रुग्णालयात नेले जात असल्याचे आणि रावलकोट व आसपासच्या परिसरात मोठ्या संख्येने नागरिकआंदोलन करत असल्याचे दिसत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांचा आवाज दाबण्यासाठी 13 शाळा आणि महाविद्यालयांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. सरकार इंटरनेट सेवांवर निर्बंध घालून आवाज दाबण्याचाही प्रयत्न करत आहे.
 
मुझफ्फराबाद मोर्चा निर्णायक वळणावर 
 
या आंदोलनाशी संबंधित असलेल्या अमन खान यांनी समर्थकांना संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, हा नागरिकांच्या हक्कांसाठीचा हा लढा आहे. मुझफ्फराबादकडे जाणारा मोर्चा एका निर्णायक वळणावर नेईल. दरम्यान, एका मानवाधिकार संघटनेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या हस्तक्षेपाची आणि या घटनांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनेक संघटनांनी हिंसाचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

Related Articles