आंदोलकांवर कायदेशीर कारवाई होणार नाही   

दिल्ली सरकारकडून आदेश जारी

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली आंदोलनात सहभागी आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. मात्र, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या आंदोलकांवर कारवाई केली जाईल, असे दिल्ली सरकारने गुरूवारी स्पष्ट केले.यासंदर्भात गृह मंत्रालयाने आदेश जारी केले. या प्रकरणात आधीच कोणाला अटक झाली असेल किंवा ताब्यात घेतले असेल तर, त्यांना तातडीने सोडण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. राजधानी दिल्लीतील आंदोलनात सहभागी आंदोलकांविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याचा सरकार विचार करत नाही. ही सर्व प्रकरणे बंद मानली जातील, असे आदेशात नमूद केले आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अल्पवयीन आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या आंदोलकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या आंदोलकांवर कारवाई केली जाईल, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.20 जुलै रोजी सीजेपीने ‘चलो संसद’ मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. या हिंसाचारात 100 हून अधिक पोलिस आणि 70 हून अधिक आंदोलक जखमी झाले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 13 गुन्हे दाखल केले होते. नीटसह विविध प्रश्‍नांवरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने हे आंदोलन केले होते. अखेर सरकारला प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. 
 
राज्यसभेतही विधेयक मंजूर
 
लोकसभेनंतर, राज्यसभेत ही सुमारे आठ तास चर्चा आणि वादविवादानंतर ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026’ मंजूर करण्यात आले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यास, सरकारकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
 
सरकार आणि तरुणांमध्ये विश्‍वास आवश्यक : वांगचुक
 
संसदेत मांडण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ चे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी गुरूवारी स्वागत केले. या विधेयकामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा होतील, अशी आशा व्यक्त केली. केंद्र सरकार अणि तरुणांमध्ये विश्‍वास आवश्यक असल्याचे सांगतानाच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, या लेखी आश्‍वासनाचा आदर करण्याचे आवाहन वंगचुक यांनी सरकारला केले आहे.कॉक्रोच जनता पार्टीतर्फे (सीजेपी) आयोजित आंदोलनात वांगचुक बेमुदत उपोषणावर बसले होते. सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.वांगचुक यांनी एक चित्रफित संदेशात म्हटले आहे की, परीक्षा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने संसदेत महत्त्वाचे विधेयक मांडण्यात आले. याचा आनंद आहे. ही सुधारणा केवळ परीक्षांमध्येच नव्हे तर शिक्षणातही होईल, असे ते म्हणाले.

Related Articles