पिण्याच्या पाण्याबाबत घातपाताचा संशय   

पेमदरा ग्रामपंचायतीची पोलिस, आरोग्य विभाग व पंचायत समितीकडे धाव

बेल्हे, (वार्ताहर) : पेमदरा (ता.जुन्नर) पिण्याचे पाणी म्हणजे जीवन. मात्र याच जीवनदायी व्यवस्थेशी छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार पेमदरा गावात समोर आला आहे. गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अनोळखी व्यक्तीकडून जाणूनबुजून घातपात करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीने केला असून, या प्रकरणामुळे संपूर्ण गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
या प्रकरणी सरपंच जयश्री पाटीलबा गाडेकर, उपसरपंच बाळासाहेब दाते तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने आळेफाटा पोलीस स्थानक, पंचायत समिती जुन्नर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे यांना स्वतंत्र पत्रे पाठवून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अनोळखी व्यक्तीने घातपात केल्याचा संशय असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या घटनेची तात्काळ चौकशी करून पाण्याची तपासणी करावी, अशी मागणी आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.
 
याशिवाय, गावातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जेसीबीच्या साहाय्याने फोडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून ग्रामपंचायतीसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच विहिरीवरील मोटारचा पाईप तोडून विहिरीत टाकणे, मोटारीची केबल कापणे आणि स्टार्टरचे नुकसान करणे अशा प्रकारांमुळे सार्वजनिक मालमत्तेची मोठी हानी झाल्याचेही ग्रामपंचायतीने नमूद केले आहे.
 
गावकर्‍यांच्या आरोग्याशी कोणालाही खेळू दिला जाणार नाही. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेवर घातपात करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे सरपंच जयश्री गाडेकर यांनी सांगितले. तर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणजे संपूर्ण गावाचे नुकसान आहे. अशा समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक असून प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, असे उपसरपंच बाळासाहेब दाते यांनी सांगितले.
  
पिण्याच्या पाण्याशी छेडछाड करणे हा केवळ कायद्याचा भंग नसून मानवी जीवनाशी खेळण्यासारखा गंभीर गुन्हा आहे. म्हणूनच अशा घटनांविरोधात प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे, संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. जागरूक नागरिक आणि तत्पर प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच अशा समाजविघातक कृत्यांना आळा बसू शकतो.

Related Articles