माळीण दुर्घटनेतील मृतांना जुन्या माळीणमध्ये श्रद्धांजली   

भिमाशंकर, (वार्ताहर) : माळीण (ता.आंबेगाव) येथे 30 जुलै 2014 रोजी झालेल्या दुर्घटनेला बारा वर्षे पूर्ण झाली. बाराव्या स्मृती दिनानिमित्ताने जुने माळीण येथे श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आलेल्या ज्येष्ठांनी स्मृतिस्तंभावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
 
माळीण गावावर बारा वर्षांपूर्वी दुःखाचा डोंगर कोसळून संपूर्ण गाव मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले. अचानक घडलेल्या या घटनेत कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. यात 44 कुटुंबातील 151 लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेला बारा वर्ष पूर्ण होत असताना जुने माळीण येथे श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काही ग्रामस्थांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांचे डोळे पाणावले, काही ग्रामस्थांनी नवीन गावात येत असलेल्या अडचणी व प्रश्‍न मांडले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, पंचायत समिती उपसभापती ज्योती पारधी, सदस्य संजय गवारी आदी उपस्थित ज्येष्ठांंसह ग्रामस्थांनी स्मृतिस्तंभावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
 
दुर्घटनेतून वाचलेले ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी दुर्घटनास्थळी जाऊन आपल्या जुन्या घरांच्या जागी आणि स्मृतीस्तंभावर नतमस्तक होऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. मृत आत्म्यांना शांती लाभावी यासाठी सामूहिक प्रार्थना आणि शांतता पाळण्यात आली.

Related Articles